• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात महामार्ग जनआक्रोश समितीतर्फे ४ जुलैला पदयात्रा

ByEditor

Jul 2, 2023

सलीम शेख
माणगाव :
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरण कामाच्या संदर्भात माणगावात महामार्ग जनआक्रोश समितीतर्फे दि. ४ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता बस आगार ते प्रांताधिकारी कार्यालय अशी टाळ मृदूंगच्या गजरात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन समितीचे रायगड जिल्हाध्यक्ष संतोष रणपिसे, माणगाव तालुकाध्यक्ष इरफान अंतुले, तालुका सचिव रमेश ढेबे व सहकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

या प्रसिद्धीपत्रकात महामार्ग जनआक्रोश समितीने म्हटले आहे कि, आपण सगळे कोकण वासीय मागील १३ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गावर जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहोत. आज एखादा अपघात घडला कि त्यातील जखमींना किंवा एखाद्या आजारी व्यक्तीला मुंबईत पुढील उपचारासाठी घेऊन जाताना अशा खड्डेमय महामार्गामुळे रस्त्यातच जीव गमवावा लागतो. अनेकांचे जीव या खड्डेमय रस्त्यामुळे व रखडलेल्या महामार्गाच्या कामामुळे गेले आहेत. या महामार्गावर आज पर्यंत ३३०० पेक्षा जास्त कोकणवासियांचे प्राण गेले असून अनेक कोकण वासियांना कायमचे अपंगत्व आले आहे. समृद्धी महामार्ग सुसज्ज अशा सुविधांसह अवघ्या ५ वर्षात बनू शकतो परंतु आपला मुंबई-गोवा महामार्ग गेली १३ वर्ष उलटून देशील पूर्ण होण्याचे चित्र अजिबात दिसत नाहीत. आज कोकण मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे. पण सुसज्ज अशा सोई-सुविधा नसल्याने विकास खुंटला आहे आणि यामुळेच कोकणातील ग्रामीण भाग दिवसेंदिवस ओसाड होत चालला आहे. याला मुख्य कारण म्हणजे कोकणातील दळणवळण सुविधा…!

यावर्षी पहिल्या २ दिवसांच्या पावसाने महामार्गाची अवस्था दैनीय झालेली आहे. प्रसंग कधी कोणावर चालून येईल याची शाश्वती नसल्याने एखादा अपघात घडून एखाद्याचे कुटुंब उध्वस्त होऊ शकते. हे अपघात थांबवायचे असतील तर या कोकणच्या महामार्गासाठी कोकणवासीय जनतेने मोठ्या संख्येने या चळवळीत सामील होणे गरजेच आहे. अन्यथा अजुन ५ वर्ष याच खड्ड्यांतून प्रवास करावा लागेल. म्हणून कोकण वासियांना समितीतर्फे आवाहन करण्यात येते कि, दि. ४ जुलै २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता माणगाव आगार ते प्रांताधिकारी कार्यालय अशी टाळ-मृदंगच्या गजरात पदयात्रा काढून प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयात निवेदन देण्यासाठी जाणार आहोत. तरी आपण सर्वांनी कोकणच्या भवितव्यासाठी व मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी मोठ्या संख्येने या पदयात्रेत सामिल व्हा. असे आवाहन मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीतर्फे करण्यात आले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!