पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा दहावीचा निकाल ९५.८१ टक्के लागला आहे. कोकण विभागाने निकालाने बाजी मारली असून, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९९.०१ टक्के लागला. तर नागपूर विभागाचा निकाल सर्वांत कमी ९४.७३ टक्के लागला.
महाराष्ट्र राज्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च महन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यंदा राज्यातील १५ लाख ४९ हजार ३२६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील यंदा ९५.८१ टक्के विद्यार्थी उत्तर्णी झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकाल १.९८ टक्क्यांनी वाढला. दरम्यान, यंदाही काही विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षा दिली. राज्यातील एकूण ९ विभागीय मंडळाकडून २५,८९४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २५,३६८ विद्यार्थी प्रत्यक्ष प्ररीक्षेत प्रविष्ट झाले. त्यापैकी २०,४०३ विद्यार्थी परीक्षा पास झाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा निकाल ८०.४२ टक्के इतका लागला आहे.
सर्व विभागीय मंडळाकडून नियमीत मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ही ९७. २१ टक्के इतकी आहे. मुलांची ९४.५६ टक्केवारी इतकी आहे. त्यामुळे यंदाही मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारली आहे. यंदा उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ५,५८,०२१ विद्यार्थ्यांना ७५ टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. दहावीतील विद्यार्थी https://mahahsscboard.in/mr या संकेतस्थळावर निकाल पाहू शकतात. त्याचबरोबर https://mahresult.nic.in/आणि msbshse.co.in या वेबसाईटवरही निकाल पाहू शकता. या वेबसाईटच्या आधारे विद्यार्थी स्वतः निकाल पाहू शकतात.
राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, की यंदा परीक्षा निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आले. त्यासाठी २७१ भरारी पथके, महिलांची विशेष पथके नियुक्त करण्यात आली होती. त्याशिवाय जिल्हा स्तरावर स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली होती. आठ माध्यमांत ही परीक्षा घेण्यात आली. प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण ऑनलाइन घेण्यात आल्याने निकाल लवकर जाहीर करण्यास मदत झाली.