घनःश्याम कडू
उरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव ठाकरे सरकारने पारित केला. त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारनेदेखील दि. बां.च्या नावाने ठराव नव्याने पारित केला. मात्र, या घडामोडीला साधारण दोन वर्षाचा कालावधी होऊनही त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण कधी होईल? असा सवाल जनता करीत आहे. नवी मुबंई आंतरराष्ट्रीय विमानतळास कोणाचे नाव लागते याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
दि. बां. पाटील यांच्या नावासाठी येथील स्थानिक एकवटून लाखोंच्या संख्येने मोर्चे, निदर्शने तसेच आंदोलने केल्यानंतर शासनास नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावाने स्वतंत्र ठराव करावा लागला होता. मात्र, नामकरणाबाबत शासन स्तरावर अंतिम निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विमानतळाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव सिडकोने पारित केल्यानंतर नामकरणाच्या वादाला सुरुवात झाली. या दरम्यान शिवसेना विरुद्ध प्रकल्पग्रस्त असा काही काळ संघर्षदेखील झाला. मात्र, शेवटी ठाकरे सरकारनेदेखील दि. बां.च्या नावाचा ठराव करून या वादावर पडदा टाकला. त्यानंतर सत्तांतर होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. या सरकारने ठाकरे सरकारने घेतलेला नामकरणाचा ठराव रद्द करून तो पुन्हा नव्याने दि. 16 जुलै 2022 रोजी घेतला होता. त्याला जवळपास 2 वर्षांचा अवधी होण्यास येऊनही नामकरणाचे घोंगडे आजतागायत भिजत पडले आहे.
लोकसभा निवडणुका होऊन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसर्यांदा सरकार रविवार, दि. 9 जून रोजी स्थापन झाले आहे. त्यामुळे आता तरी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील असे नामकरण कधी होईल का? इतर कोणाचे लाव लागणार तर नाही ना? असा सवालही यानिमित्ताने उभा रहात आहे. मात्र, विमानतळाला दि. बां.चेच नाव द्यावे या भूमिकेवर येथील भूमिपुत्र आजही ठाम असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.