• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

वायशेत येथील आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांना वाढत्या उन्हाचा तडाखा

ByEditor

May 27, 2024

ग्राहकांविना दिवसभर बाजारात शुकशुकाट

अब्दुल सोगावकर
सोगाव :
राज्यातील वाढत्या उन्हाचा फटका सर्वांनाच बसला आहे. तापमान ४२ अंशापेक्षा जास्त वाढ झाल्याने अलिबाग तालुक्यातील वायशेत येथील रविवारच्या आठवडा बाजारातील असणारी गर्दी रविवार दि. २६ मेच्या दिवशी कडक उन्हामुळे व भाज्यांचे दर कडाडल्याने ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे कमी प्रमाणात होती. यामुळे बाजारात शुकशुकाट पसरला होता. ग्राहकांविना व्यापारी व किरकोळ भाजी विक्रेते हवालदिल झाले असल्याचे दिसून आले.

राज्यभरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने भाज्यांचे दर मात्र कडाडल्यामुळे बहुतांश भाज्यांची विक्री ४० ते ५० रुपये पाव किलो दराने सुरू होती, तर कोथिंबीरची जुडी तब्बल ५० रुपये दराने विकली जात होती. यामुळे ग्राहक काही अंशी नाराज झाले होते. अशातच आगोटीची लगबग सुरु झाली असल्यामुळे महिला व पुरुष ग्राहक कांदे, बटाटे, लसूण, सुकी मच्छी, कडधान्ये, कपडे, छत्र्या, चपला आदी पावसाळ्यातील गरजेच्या व साठवणूक करणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना दिसून आले. संध्याकाळी ऊन कमी झाल्यानंतर ग्राहकांनी उशिरा बाजारात खरेदीसाठी धाव घेतली. यामुळे व्यापारी वर्गाला काही अंशी दिलासा मिळाला.

आज भाज्यांची मोठ्या प्रमाणात दरवाढ झाल्याने आमचे जगणे कठीण झाले आहे. यापूर्वी २० ते ३० रुपये पाव किलो असलेल्या भाज्या आज ४० व ५० रुपये पाव किलो झाल्या आहेत, तसेच कोथिंबीरची ५० रुपये असलेली जुडी आज कशी विकत घ्यायची?, आम्हाला परवडत नाही, कमवणार काय आणि विकत काय घेणार असा प्रश्न पडला आहे. या भाज्यांचे दर आम्हाला परवडण्यासारखे नाही.

-स्वप्नाली म्हात्रे, गृहिणी

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!