• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

साहित्यिक रमेश धनावडे सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित

ByEditor

May 30, 2024

प्रतिनिधी
अलिबाग :
रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक रायगड भूषण रमेश प्रभाकर धनावडे यांनी केलेल्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य व पत्रकारिता क्षेत्रांमधील गौरवपूर्वक व उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र असणाऱ्या मराठी साहित्य मंडळाने सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर येथे नुकत्याच झालेल्या एका शानदार कार्यक्रमामध्ये त्यांना साहित्यिक योगदानाबद्दल सन्मानपत्र गौरवाने प्रदान करण्यात आले. समाजाची सेवा, समाज उपयोगी कार्याची समाजाला ओळख व त्याद्वारे समाज घटकांना प्रेरणा मिळावी यासाठी अधिक जोमाने कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळावी हा पुरस्काराचा हेतू आहे.

रमेश प्रभाकर धनावडे यांचे एम.कॉम., एल एल. बी., एम.बी.ए. पर्यंत शिक्षण झाले असून रिलायन्स इंडस्ट्रीज नागोठणे येथे ते डेप्युटी जनरल मॅनेजर एच.आर. (कॉर्पोरेट अफेअर्स) म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांचे मनतरंग काव्यसंग्रह, ऊर्मी चारोळी संग्रह, जीवनगाणे ललितलेख संग्रह, कवितेच्या सुरातून हा लेख संग्रह (महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ६३ कविंवरील यशोगाथा) ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. जीवनगाणे हा स्तंभ दैनिक कृषीवलमध्ये सलग तीन वर्षे प्रसिद्ध झाला आहे. ‘गुदगुल्या’ या राजकीय व सामाजिक वात्रटिका दैनिक पुढारीमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. दैनिक रायगड टाईम्ससाठी ‘बी पॉझिटिव्ह’ या डिजिटल मुलाखतीही प्रसिद्ध झाल्या आहेत. अनेक दिवाळी अंकांमध्ये त्यांच्या कथा, लेख आणि कविता प्रसिद्ध होत असतात. ‘कवितेच्या सुरातून’ हा महाराष्ट्रातील प्रख्यात कवींवरील स्तंभ दैनिक पुढारीमध्ये सलग दीड वर्ष प्रसिद्ध झाला आहे.

त्यांनी माजी विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन म्हणूनही कार्य केले आहे. आकाशवाणी मुंबई केंद्रावर अर्धा तास स्वरचित काव्यवाचन केले आहे तसेच त्यांनी माजी प्रेसिडेंट अलिबाग लायन्स क्लब म्हणूनही उत्कृष्ट कार्य केले आहे. कोकण मराठी साहित्य परिषद अलिबाग तालुका प्रतिनिधी आणि रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. ‘गीत रामायण’ व इतर अनेक कार्यक्रमांसाठी त्यांनी सूत्रसंचालन केले आहे. ‘गोष्ट तिच्या प्रेमाची’या मराठी चित्रपटासाठी गीतकार म्हणूनही त्यांनी पदार्पण केले आहे. अनेक अखिल भारतीय साहित्य संमेलनात यांचा सहभाग असतो. अनेक शाळा कॉलेजवर प्रमुख वक्ता म्हणून व अनेक काव्यसंमेलनात कवी म्हणून ते आमंत्रित असतात.

त्यांना आजवर रायगड भूषण पुरस्कार, रायगड जिल्हा पत्रकार संघाचा र. वा. दिघे पुरस्कार, कृषीवल कौतुक पुरस्कार, दैनिक पुढारी सन्मान पुरस्कार, म. ना. पाटील साहित्य पुरस्कार, नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार संघ पुरस्कार, स्तंभ विचार परिषद पुरस्कार, सुभानराव राणे प्रतिष्ठान पुरस्कार, साहित्यसंपदा काव्यरत्न पुरस्कार, नवभारत नवराष्ट्र टाइम्सचा आदर्श कला साहित्यिक पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल त्यांचे समाजातील विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!