मिलिंद माने
महाड : मनुस्मृति दहन करण्यापूर्वी महाड येथील क्रांती स्तंभाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेले कागदी बॅनर फाडून धार्मिक श्रद्धांचा व भावनांचा अपमान केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात ते आठ जणांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार कलम कायद्यानुसार (ॲट्रॉसिटी) महाड शहर पोलीस ठाण्यात उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाड येथील क्रांती स्तंभावर मनुस्मृती दहन करण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले कागदी बॅनर फाडण्याचा प्रकार महाडमध्ये 29 मे रोजी दुपारी एकच्या सुमारास घडला. या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. या प्रकारानंतर राज्यभरात आंबेडकरी अनुयायांमार्फत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला तर ठाण्यात याबाबत जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन व निदर्शने करण्यात आली. त्यानंतर महाड पोलीस ठाण्यात यासंदर्भात संदेश जीवन साळवी (रा. किंजळोली खुर्द तालुका महाड) याने दिलेल्या फिर्यादीनुसार महाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
महाड येथील संदेश जीवन साळवी याने दिलेल्या फिर्यादीनुसार महाड शहर पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या आदेशानुसार महाड शहर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार कलम 3(1)(T) 3(2) (V) (A) नुसार भारतीय दंड विधान संहिता कलम 295 (अ ) 34 नुसार जितेंद्र आव्हाड व अन्य सात ते आठ अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल केला आहे. महाड शहर पोलीस ठाण्यात संदेश जीवन साळवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महाड शहर पोलीस ठाण्याने दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये असे म्हटले आहे की, बौद्ध धर्माचे व दलित समाजाचे श्रद्धास्थान असलेले डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकर यांचा फोटो असलेले कागदी बॅनर फाडून धार्मिक श्रद्धांचा व भावनांचा अपमान केला म्हणून जितेंद्र आव्हाड व अन्य सात ते आठ जणांवर अनुसूचित जाती जमाती कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला असून याबाबत पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे हे करीत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार (ॲट्रॉसिटी) कलम अंतर्गत महाड शहर पोलीस ठाण्यात दाखल केला असला तरी झालेला प्रकार हा अनावधानाने झाला असल्याने याबाबत आंबेडकरी अनुयायांनी महाराष्ट्रातील जनतेला शांत राहण्याचा सल्ला दिला असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे. तर दुसरीकडे मनस्मृतीचा मुद्दा राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात आणण्याचा निर्णय भाजपाप्रणित सरकारने घेतला असल्याने याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत आवाज उठवल्याने राज्यातील आंबेडकरी अनुयायी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना समर्थन देत असल्याच्या प्रतिक्रिया राज्याच्या कानाकोपऱ्यातून येताना दिसत आहेत.