विश्वास निकम
कोलाड : मे महिना संपत आला असुन मासेमारीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. काही दिवसात मासेमारी बंद करण्यात येईल. यामुळे पावसाळ्यात सुकी मासळी मिळत नाही. यामुळे पावसाळ्यात सुक्या मासळीची साठवण केली जाते. सुक्या मासळीची मागणी वाढल्यामुळे या मासळीचे दर वाढले आहेत.
पावसाळा सुरु होण्याआधी सुक्या मासळीला राज्यभरातून वाढती मागणी असते. त्यामुळे मासळीची मोठी बाजारपेठ असलेल्या ठिकाणी सुक्या मासळीची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची लगबग पहावयास मिळत आहे. यामध्ये जवळा (सुकट), बोंबील, मांदेली, कोळंबी, बांगडा, अंबाड, मासेसुकट, सोडे यांची मागणी वाढली आहे. पावसाळा लवकरच सुरु होणार असल्यामुळे पावसाळ्यासाठी सुक्या मासळीची साठवण करण्यासाठी सुक्या मासळीची मागणी वाढली असल्याने त्याचे दर वाढले आहेत. यामध्ये सुकट प्रतिकिलो २०० ते ३००, वाकटी ४०० ते ५००, बोंबील ४५० ते ५००, सोडे १००० ते १२०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. इतर सुक्या मासळीचे दर देखील अधिक वाढल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.