अलिबाग : “यावेळी सर्व पक्ष नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एकत्र आले होते तरी देशातील जनतेने त्यांना पुन्हा संधी दिली आहे. राज्यात आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही ही वस्तुस्थिती मान्य आहे. महविकास आघाडीने ज्या पद्धतीने ग्राम पातळीवर कार्यकर्त्यांची फळी अगदी सुरवातीपासून तयार केली. दुर्दैवाने तशी फळी तयार करण्यात आम्ही अपयशी ठरलो. यावेळी झालेल्या चुका आम्ही सुधारू. राष्ट्रवादी काँगेसने यावेळी 4 जागा लढवल्या त्यातील एकच जिंकलो. हे अपयश का मिळालं याचं आम्ही आत्मपरीक्षण करू,” असं अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी म्हटलं आहे.
मी सर्वांचा ऋणी आहे; सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
“महायुती मधील सर्व घटक पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत, विकासाच्या मुद्द्यावर लढवलेली निवडणूक याला इथल्या जनतेने साथ दिली. मी रायगड, रत्नागिरी मधील जनतेचा ऋणी आहे. त्यांचे ऋण मी कधीच विसरणार नाही. महायुतीला कोकणात मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून यापुढे काम करणार आहे. केवळ लोकसभेपुरता नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत कोकणात सर्व जागा जिंकून आणण्याचा निर्धार करतो आहे,” असं रायगडमधील अजित पवार गटाचे उमेदवार सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.