किरण लाड
नागोठणे : पावसाळा सुरु झाला की बाजारात निरनिराळ्या प्रकारच्या रानभाज्या बघायला मिळतात. तेरा, कुर्डु, कुलू, भारंग, शेवळाची भाजी या आर्युवैदिक रानभाज्या पावसाळ्यात बघायला मिळतात. या रानभाज्या चवीला तुरट, कडु, घशाला खवखवणाऱ्या जरी असल्या तरी, आरोग्यदायी आहेत. वर्षानी येणाऱ्या या रानभाज्या आपण खाव्यात जेणेकरुण आपल्या सर्वांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.

पावसाळ्यातील रानभाज्यांमध्ये सर्वात ताकदवान, आरोग्यासाठी फायदेशीर कोणती रानभाजी असेल तर, ती ‘करटोली’ किंवा तीला काटवल या दुसऱ्या नावानेही संबोधले जाते. पावसाळ्यात वर्षातुन एकदा येणारी करटोली रानात उगविण्याचा कालावधी हा आॅगस्ट ते आॅक्टोबर महिन्याचा असतो. या महिन्यांत करटोली भाजी मोठ्या प्रमाणावर बाजारात येत असते. डोंगर-दऱ्यात राहणाऱ्या आदीवासी बांधवांच्या उपजिवेकेचे साधन या रानभाज्या आहेत. करटोली भाजी तीन प्रकारांध्ये मोडतात. पहिल्या प्रकारामध्ये ह्या भाजीची फुले दिवसा उगवतात, ती पिवळ्या रंगाची असतात, तसेच वेलीवर ही फळे लागतात, ती फळे साधारण मोठ्या आकाराची असतात. पाने एकसारखी असतात. दुसऱ्या प्रकारामध्ये करटोलीच्या झाडांची फुले पिवळी असतात पण ती रात्री उगवतात, वेलीवर उगवणारी फळे लहान असतात. ही झाडे घराजवळ किंवा शेताच्या बांधावर लावली जातात. तिसऱ्या प्रकारची करटोली ही वांज प्रकारामध्ये मोडतात. या झाडांवर फळे लागत नाही कारण ती,पुरुष जातीचे असतात. ही झाडे प्रजननासाठी दुसऱ्या दोन प्रकारच्या करटोलीच्या झाडांना मदत करतात.
करटोली जंगली आहे. तसेच ती ताकदवान आहे कारण तिचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रणामध्ये राहते. डायबिटीस असलेल्यांना ही भाजी उपयुक्त आहे. तसेच ती मूळव्याधीवर गुणकारी आहे. तिच्यामध्ये कार्बोहायड्रेट, स्निग्ध, क्षार या पदार्थांचे प्रमाण जास्त असल्याने ती आरोग्यासाठी सर्व जीवनसत्वयुक्त अशी भाजी आहे. करटोली ही भाजी बाजारात 200 ते 250 रुपये प्रति किलो भावाने विकली जाते. यावरुन आपल्याला कल्पना येईल कि, करटोली भाजीला सर्व भाज्यांमध्ये ताकदवान भाजी का बोलली जाते. करटोली भाजीचा आरोग्यासाठी होणारा फायदा बघुन तिची ठिकठिकाणी लागवड होताना आपल्याला बघायला मिळत आहे.