• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आ. जयंत पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा रद्द

ByEditor

Jul 5, 2023

समृद्धी महामार्गावरील घटनेमुळे घेतला निर्णय

अमूलकुमार जैन
अलिबाग :
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांचा दि. ७ जुलै रोजी वाढदिवस आहे. मात्र, यंदा त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच समृद्धी महामार्गावर एका खासगी बसच्या अपघातामध्ये २५ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. या पार्श्वभूमीवर आ. जयंत पाटील यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे परिपत्रक शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने काढण्यात आले आहे.

आ. जयंत पाटील यांचा वाढदिवस म्हणजे कार्यकर्त्यांसाठी एक वेगळी ऊर्जा देणारा दिवस समजला जातो. या दिवशी रायगड जिल्ह्यासह वेगवेगळ्या जिल्ह्यातून, राज्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्यासाठी अलिबागमध्ये दाखल होतात. आ. जयंत पाटील यांच्या अलिबागमधील वेश्वी येथील निवासस्थानी सकाळी सहा वाजल्यापासून कार्यकर्त्यांची गर्दी होते. या दिवशी सांस्कृतिक उपक्रमांसह सामाजिक उपक्रम राबवून आ. जयंत पाटील यांचा वाढदिवस साजरा केला जातो. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह निर्माण होतो. ग्रामीण भागासह शहरी भागातील वाड्या वस्त्यांमधील कार्यकर्ते या दिवशी आ. जयंत पाटील यांना भेटण्यासाठी आतुर असतात. या दिवशी कार्यकर्त्यांमध्येही मोठा उत्साह दिसून येतो. मात्र, यंदाचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

आ. जयंत पाटील सदर दिवशी अलिबागमध्ये भेटणार नाहीत. तरी कार्यकर्ते, हितचिंतकांनी प्रत्यक्ष भेट न घेता सामाजिक कामे करा, आपल्या कामातून जनतेला मदत होईल, असे कार्य करण्याचे आवाहन आ. जयंत पाटील यांनी केले आहे. दरम्यान, सर्व कार्यकर्ते त्यांना सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देऊ शकतात, असे अभिष्टचिंतन सोहळा समितीच्यावतीने सांगण्यात आले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!