काल कारवाईचं नाटक, आज पुन्हा बांधकाम सुरू
अनंत नारंगीकर
उरण : विंधणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील प्रांजली या गोदामावर सिडको-नैना प्राधिकरण विभागाच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी (दि. ७) कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र, काही तासांचा अवधी लोटत नाही तोच मालाची हाताळणी करणाऱ्या गोदाम व्यावसायिकांनी सदर गोदामांचे नव्याने बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सिडको-नैना प्राधिकरण विभागाच्या कारवाई संदर्भात संशयाचा धूर निघत आहे.

उरण तालुक्यातील चिर्ले, वेश्वी, दिघोडे, विंधणे, चिरनेर, मोठी जुई, कळंबुसरे, कोप्रोली, पिरकोण, सारडे सह इतर ग्रामपंचायत हद्दीतील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामांची बांधकामे उभी राहत आहेत. तसेच अनाधिकृत बांधकामे राजरोसपणे सुरू आहेत. सदर बांधकामे ही शासनाच्या नियमानुसार होत नसल्याने सदरची बांधकामे हटविण्यात यावी यासाठी संबंधित गावकरी, विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संस्था कोकण आयुक्त, जिल्हाधिकारी, सिडको, तहसील कार्यालय, नैना प्राधिकरण, कस्टम, स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयाकडे तक्रार दाखल करत आहेत.
मात्र, अशा तक्रार अर्जांची छाननी किंवा दखल संबंधित प्रशासनाचे अधिकारी वर्ग घेत नसल्याने सदर ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यात नैना प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकाला धर आणि दुसऱ्याला पळ ही नियमावली तयार केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चिरनेर विभाग अध्यक्ष संदीप ठाकूर यांनी विंधणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील पोई येथील प्रांजली या गोदामावर कारवाई करण्यासंदर्भात तक्रार अर्ज सिडको-नैना प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. त्या तक्रार अर्जांची दखल सिडको-नैना अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेऊन शुक्रवारी (दि. ७) आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र, काही तासांचा अवधी लोटत नाही तोच शनिवारी (दि. ८) सदर गोदाम व्यावसायिकांनी पुन्हा नव्याने बांधकाम सुरू केले आहे. त्यामुळे सिडको-नैना प्राधिकरण अतिक्रमण विभागाच्या कारवाई संदर्भात संशय व्यक्त केला जात आहे.
यासंदर्भात सिडको-नैना अतिक्रमण विभागाचे अधिकारी श्री. चौरले यांच्याकडे विचारणा केली असता ते नाशिक या ठिकाणी सुट्टी असल्याने जात असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. एकंदरीत देशात पुन्हा मोदींचे सरकार येत असल्याने आणि राज्यात शिंदेंचे सरकार असल्याने कोणीच कोणाला घाबरत नसल्याचे दिसून येत आहे.