मुंबई : राज्याच्या राजकारणात क्षणाक्षणाला नवनवीन घडामोडी घडतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतच दोन गट निर्माण झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिंदे गटांच्या बैठकांवर बैठका सुरु आहे. तर आम्ही सुद्धा बंड केले असून, ज्यांना मंत्रीपद देण्यात आली त्यांचे मंत्रीपदा काढा अशी मागणी इतर आमदारांनी केली आहे. शिंदे गटात मंत्री असलेले आमदार आणि मंत्री नसलेले आमदार असे दोन गट पडल्याची चर्चा सुरु आहे. तसेच पक्षात नाराजी आहे असं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी देखील कबूल केले आहे.
राज्यात शिंदे गट आणि भाजपची सत्ता असतानाच रविवारी अचानक अजित पवारांनी आपल्या 9 आमदारांसह मंत्रीपदाची शपथ घेऊन, सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि आपल्यालाही मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा लावून असलेल्या शिंदे गटाच्या आमदारांचा हिरमोड झाला आहे. सत्तेत आणखी एक पक्ष वाटेदार झाल्याने मंत्री नसलेल्या आमदारांमध्ये नाराजी आहे. तर मंत्री असलेले आणि मंत्री नसलेले आमदार असे दोन गट शिंदे गटात पाहायला मिळत आहे. तर पक्षाच्या बैठकीत मंत्रीपदाची अपेक्षा लावून बसलेल्या आमदारांनी आपली नाराजी उघडपणे मांडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आधी मंत्री झालेल्या लोकांचे मंत्रीपद काढून घेण्याची मागणी देखील आमदारांनी बैठकीत केल्याची माहिती आहे.
बैठकीत काय झाले?
अजित पवारांच्या एन्ट्रीनंतर शिंदे गटाच्या बैठकांवर बैठका होत आहे. दरम्यान अशाच एका बैठकीत मंत्री नसलेल्या आमदारांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. ‘आम्ही देखील बंड केला आहे. त्यामुळे आम्ही दूर का?, आम्ही फक्त पालख्या वाहण्याचे काम करायचे का? आम्हाला कधी न्याय मिळणार?, असे प्रश्न या आमदारांनी उपस्थित केले. विशेष म्हणजे पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संधी न मिळालेल्या अनेक आमदारांना दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी देण्याची आश्वासन देण्यात आले होते. काहींनी तर आपली मंत्रीपदाची इच्छा देखील उघडपणे बोलून दाखवली होती. मात्र दुसरा मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीच्या आमदारांची एन्ट्री झाल्याने शिंदे गटातील इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरले आहे. त्यामुळे त्यांच्यात मोठी नाराजी आहे. त्यामुळे आता मंत्री असलेल्या लोकांची मंत्रिपदे काढून घेण्याची मागणी काही आमदारांनी बैठकीत केली आहे.