माणगाव येथील सत्कार व आभार कार्यक्रमात खा. सुनील तटकरेंनी स्पष्ट केला इरादा
सलीम शेख
माणगाव : विरोधकांना त्यांची जागा आपल्याला दाखवायची असून रायगड जिल्हा परिषद अलिबागच्या शिवतीर्थावर महायुतीचा झेंडा फडकविल्याशिवाय आता आपण गप्प बसायचे नाही असे रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांनी माणगाव येथील सत्कार व मतदारांचे आभार कार्यक्रमात महायुतीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलून येणाऱ्या सर्वच निवडणुकांबाबत आपला इरादा स्पष्ट केला.
३२ रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदार संघाच्या नुकत्याच झालेल्या ऐतिहासिक निवडणुकीत महायुतीचे सुनील तटकरे हे खासदार म्हणून दणदणीत मतांनी निवडून आल्याने त्यांचा महायुतीतर्फे माणगाव येथील गांधी मेमोरियल हॉलमध्ये शनिवार, दि. १५ जून २०२४ रोजी सायंकाळी सत्कार सोहळा व मतदार बंधू-भगिनी तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे जाहीर ऋण व आभार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात खा. सुनील तटकरे यांनी मतदार बंधू-भगिनी तसेच महायुतीचे पदाधीकारी व कार्यकर्ते यांचे जाहीर ऋण व आभार मानून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास महाड-पोलापूर-माणगावचे आ. भरत गोगावले, शिवसेनेचे दक्षिण रायगड, जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, प्रदेश शिवसेनेचे प्रवक्ते ॲड. राजीव साबळे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश युवक सचिव दीपक जाधव, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, कृषी उत्पन्न बाजार समिती रमेश मोरे, शिवसेना महिला जिल्हा आघाडीप्रमुख नीलिमा घोसाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र मोरे, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सुभाष केकाणे, शिवसेना तालुकाप्रमुख ॲड. महेंद्र मानकर, भाजप तालुकाध्यक्ष उमेश साटम, राष्ट्रवादी काँग्रेस श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष अल्ताफ धनसे, उणेगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजेंद्र शिर्के, जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष शादाब गैबी, भाजप शहराध्यक्ष नितीन दसवते, शिवसेना शहरप्रमुख सुनील पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष नितीन वाढवळ, साई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच हुसेन राहटविलकर, महादेव बक्कम, काका नवगने, माजी सभापती सुजित शिंदे, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, संदीप खरंगटे, दिलीप जाधव, माजी नगरसेवक जयंत बोडेरे, माजी नगरसेवक हेमंत शेट, सुमित काळे, सौरभ खैरे, तालुका राष्ट्रवादी उपाध्यक्ष राजू मोरे, संताजी पवार, गोरेगाव सरपंच जुबेर अब्बासी, राजेश कदम, उदय अधिकारी, समीर मेहता आदी मान्यवरांसह माणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, मनसे व आरपीआय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना खा. तटकरे पुढे म्हणाले कि, देशाच्या लोकसभा निवडणुकीला आपण सर्वजण सामोरे गेलो. या निवडणुकीत विरोधकांकडून वेगळे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जी घटना, संविधान दिले ती महायुतीचे सरकार आल्यावर पूर्णपणे बदलले जाईल असे वातावरण तयार करण्यात आले होते. महायुतीचे आम्ही सर्व नेते मंडळी चंद्र, सूर्य, तारे असेपर्यंत संविधान बदलता येणार नाही असे सांगत होतो. पण विरोधकांनी महायुतीचे सरकार आल्यावर हे संविधान बदलले जाईल असे जनतेच्या मनावर बिंबवले होते. जनतेच्या मनातून हे सर्व काही काढून टाकण्यात आपल्याला अपयश आले. अल्पसंख्यांक समाजाच्या मनात असुरक्षिततेच्या भावना देश व राज्य पातळीवर निर्माण केल्या गेल्या. समाजात, धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून झाला. मात्र, धर्मनिरपेक्ष विचारांची तडजोड करायची नाही तर धर्मनिरपेक्ष विचारावर आम्ही सारी मंडळी जसे आजपर्यंत बहुजन समाजात काम करीत आलो आहोत तसेच काम यापुढेही करणार आहोत.
अनंत गीतेंनी आपल्या राजकीय आयुष्यात समाजावर मते मागण्याचे काम केले. या निवडणुकीत जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. अभूतपूर्व असे यश मला महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जोरावर मिळाले. ८२ हजाराहून अधिक मतांनी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने निवडून आलो. मला अलिबाग, पेण मतदारसंघातून भरपूर मताधिक्य मिळाले. श्रीवर्धन मतदार संघातूनही २९ हजाराचे मताधिक्य मिळाले. महाड मतदार संघातून ३७०० मतांची आघाडी असली तरी या मतदार संघात आ. भरत गोगावले यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली ते आपण पाहिले. दापोली, गुहागर मतदार संघातूनही महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चांगले काम केले. सुनील तटकरे केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खासदार नव्हे तर महायुतीचा खासदार म्हणून पूर्ण क्षमतेने काम करणार आहे. ५ वर्षे विरोधी पक्षाच्या बाकावर बसून काम केले. आता सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसून काम करणार आहे. भारत सरकारच्या विविध विकासाच्या योजना मी मतदार संघात करणार आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाकडेही खास लक्ष देणार आहे. लोककल्याणकारी हितासाठी आम्ही सारी मंडळी बांधील आहोत. येणाऱ्या सर्वच निवडणूक आपल्याला महायुतीच्या माध्यमातून लढवायच्या आहेत. विधानसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदार संघातील आपल्याला सर्व सातही जागा जिंकायच्या असून अलिबाग शिवतीर्थावर महायुतीचा झेंडा फडकविण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन यावेळी त्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.
यावेळी मार्गदर्शन करताना आ. भरत गोगावले यांनी सुरवातीलाच रायगड लोकसभा मतदार संघात महायुतीला यश मिळाल्याबद्दल मतदारसंघातील सर्व मतदार व महायुतीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांना धन्यवाद देत त्यांचे आभार मानले. आ. गोगावले पुढे म्हणाले कि, महाराष्ट्रातून लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुनील तटकरे यांच्या रूपाने एक जागा मिळून रायगड मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आल्याने मी सुनील तटकरे यांचे अभिनंदन करतो. समाजावर कधी राजकारण चालत नाही. समाजावर राजकारण चालले असते तर बऱ्याचशा घडामोडी घडल्या असत्या. विरोधकांनी समाजावर राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्याचा काही परिणाम रायगड मतदार संघात झाला नाही. सुनील तटकरे, भरतशेठ व शिवसेना आम्ही सारी मंडळी काम करणारी आहोत. महाड मतदार संघातील असे कुठले वाडी-वस्ती गाव दाखवा जेथे भरतशेठचे काम नाही. जनतेच्या अडीअडचणी, प्रसंगाला आम्ही मंडळी धावून जातो, मदत करतो. मग अजून आम्ही काय करायला हवे? असा सवाल करीत येणाऱ्या सर्वच निवडणुकात महायुतीचे नातं सर्वांनी घट्ट ठेऊन हातात हात घालून काम करूया असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी भाजपचे दक्षिण रायगड युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांनी आपल्या मार्गदर्शनात जनतेचे हित हाच एकमेव उद्देश महायुतीचा असून खा. सुनील तटकरे यांचे अभिनंदन केले. शिवसेना दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी आपल्या मार्गदर्शनात बोलताना रायगड लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चांगले काम केल्याने खा. सुनील तटकरे हे मोठ्या फरकाने विजयी झाल्याचे सांगितले. यावेळी घोसाळकर यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या इंदापूर ते वडपाले रस्त्याचे काम तातडीने करा, माणगाव बायपासचा प्रश्न सोडवला गेला पाहिजे याकडे खा. तटकरे यांचे लक्ष वेधून रायगड लोकसभा निवडणुकीत खा. सुनील तटकरे भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमाला खा. सुनील तटकरे यांचे आगमन होताच फटाक्यांचे आतषबाजीत त्यांचे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले. कार्यक्रमचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते तथा उणेगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजेंद्र शिर्के यांनी केले.