अलिबाग : शहरानजीक असलेल्या कुरुळ गावात जुगार क्लब राजरोसपणे सुरु आहे. या जुगाराच्या अड्ड्यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. अलिबाग पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
कुरुळ महिला खाडीतून कालवे आणून ते विकण्याचा व्यवसाय करतात. त्यामुळे कष्टकऱ्यांचा गाव म्हणून कुरुळ गावाची वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. मात्र, याच गावात काही बाहेरील धनदांडग्यांनी जुगाराचा धंदा खुलेआमपणे सुरू केला आहे. ज्या ठिकाणी धंदा सुरु आहे, त्या परिसरात शाळादेखील आहे. त्यामुळे महिला सुरक्षेच्या प्रश्नासह विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. दिवस-रात्र जुगार अड्डा सुरु असल्याने त्याचा परिणाम काही कुटुंबांवरही होत आहे.
अलिबाग पोलिसांना या अड्डयाबाबत माहिती असतानादेखील त्या धंद्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. पोलीस फक्त बघ्याची भूमिका का घेत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. बाहेरील काही मंडळींकडून या परिसरात खुलेआमपणे धंदे चालविले जात असल्याने नागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
राजकीय वरदहस्तामुळे जुगाराचा अड्डा सुरु?
कुरुळ येथील जुगार अड्डा चालविणाऱ्यावर जिल्ह्यातील मोठ्या नेत्याचा राजकीय वरदहस्त असल्यामुळे या अड्ड्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. मात्र, अनेक संसार उध्वस्त करणाऱ्या या धंद्यावर कृपादृष्टी असणाऱ्या राजकीय नेत्याने सामान्य जनतेचा हिताचा विचार करणे गरजेचे असल्याचे मत सर्वसामान्य जनतेतून व्यक्त करण्यात येत आहे.