अनंत नारंगीकर
उरण : भाजीपाला-फलोत्पादन आणि शेतीत व्यवसायात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून २३ फेब्रुवारी २०२४ रोजी विविध प्रकारचे कृषी पुरस्कार जाहीर करण्यात आले. मात्र, ४ महिन्यांचा कालावधी लोटला असतानाही जाहीर करण्यात आलेल्या कृषी पुरस्काराचे वितरण करण्यास राज्यातील मुख्यमंत्री व कृषी मंत्र्याना वेळच मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
१ जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून महाराष्ट्र राज्य सरकार मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. या दिवसाचे औचित्य साधून भाजीपाला-फलोत्पादन आणि शेतीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकार विविध प्रकारचे कृषी भुषण तसेच वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करुन राज्यातील इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
मात्र, राज्य सरकारकडून राज्यातील शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना २३ फेब्रुवारी २०२४ रोजी जाहीर करण्यात आलेल्या कृषी पुरस्काराचे वितरण करण्यास वेळच मिळत नसल्याने राज्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुर उमटू लागला आहे. तरी राज्य सरकारने १ जुलै या कृषी दिनाचे औचित्य साधून जाहीर करण्यात आलेल्या कृषी पुरस्काराचे वितरण करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी शेतीनिष्ठ शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते निर्भय म्हात्रे यांनी केली आहे.