विठ्ठल ममताबादे
उरण : तालुक्यातील न्हावा शेवा बंदराच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शेवा गावठाणाची जमीन सुद्धा लागेल असे बनावट कारण सांगून शासनाने शेवा गावातील ग्रामस्थांना विस्थापित करून मौजे बोकडवीरा येथील जमिनीवर गेली ३९ वर्ष तात्पुरत्या स्वरुपात वास्तव्यास ठेवले होते. एमआरपीटीपी ॲक्ट १९७६ नुसार या विस्थापितांचे पुनर्वसन करणे गरजेचे होते. परंतु, या विस्थापितांना शासनाने दुर्लक्षित करून ३३ हेक्टर ऐवजी फक्त १० हेक्टरवर तात्पुरत्या स्वरुपात वास्तव्यास ठेवले होते.
गेली अनेक वर्षे गावकरी संघर्ष करून, आंदोलने करून आपला हक्क मागत होते, पण शासन व जेएनपीटी याकडे दुर्लक्ष करून खोटी कारणं सांगून टाळाटाळ करीत होते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून गावातील ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करून व सततचा पाठपुरावा करून शेवटी यश पदरी पाडले. सोमवार, दि. ०१/०७/२०२४ रोजी जेएनपीटी पुनर्वसित नवीन शेवा गावाची ३३.६४.०५ हेक्टर जमिनीची कायमहक्क मोजणी करण्यात येत असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.