चालकाच्या हुशारीमुळे मोठे संकट टळले
घन:श्याम कडू
उरण : आज दि. २५ जूनच्या सकाळी उरणकरांना भर बाजारात एक भयानक दृश्य पाहायला मिळाले आणि उरणकरांची एकच भंबेरी उडाली. उरण शहरातील राजपाल नाका येथे एका ट्रकमधील सामानाला आग लागली. ट्रकमधून ज्वाळा आणि धूर बाहेर पडत होता. बघता बघता आग पसरेल आणि मोठा अनर्थ घडेल की काय या विवंचनेत प्रत्यक्षदर्शी होते. या प्रकाराने बाजारपेठेत एकच घबराट पसरली होती. मात्र, बहाद्दूर ट्रक चालकाने धीर न सोडता प्रसंगावधान राखत बाजारपेठमधून चालकाने जळता ट्रक न थांबता थेट तो शहराच्या बाहेर आणून उभा केला.
मोरा रोडवर आजूबाजूला कोणीही नसलेल्या ठिकाणी येऊन त्याने अर्धा जळालेला ट्रक आणून सोडला. त्याठिकाणी स्थानिक नागरिकांनी लागलीच अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या २ गाड्यांवरील जवानांनी तात्काळ जळत असलेल्या ट्रकला लागलेली आग आटोक्यात आणली. सदर आगीत कोणतीच जीवितहानी झाली नाही. मात्र, मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या ट्रकमध्ये नेमके काय सामान काय होते आणि आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजले नाही. मात्र, केवळ हुशार चालकाच्या चलाखीमुळे उरणकरांवर आलेलं मोठं संकट टळलं. भर गर्दीच्या ठिकाणी ही आग पसरली असती तर जीवितहानीसह वित्तहानी देखील मोठ्या प्रमाणात झाली असती.
चालकाने प्रसंगसावधान राखले नसते तर शहरातील काही ठिकाणी आगीचा विळखा पडून जीवितहानी होण्याची शक्यता होती. सदर ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिवसरात्र बेकायदेशीर अनेक गाड्या पार्क केलेल्या असतात. यावर वेळीच कारवाई करावी अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, ही दुर्घटना भीषण होण्यापासून थोडक्यात टळली असली तरी उरणच्या प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहायला हवे असे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.