टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी
अनंत नारंगीकर
उरण : भर पावसाळ्यातील जून महिन्यातच पुनाडे धरण कोरडे पडत असल्याचे भयानक चित्र समोर येत आहे. त्यामुळे उरण तालुक्यातील २५ हजार रहिवाशांना गेल्या आठ दिवसांपासून भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तरी संबंधित प्रशासनाने जातीने लक्ष केंद्रित करून रहिवाशांना टँकरने किंवा हेटवणे धरणातून पाणीपुरवठा करावा अशी मागणी पुनाडे आठ गाव ग्रामीण नळ पाणीपुरवठा कमिटीच्यावतीने उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

शेतीच्या सिंचनासाठी लघु पाटबंधारे विभागाने उरण तालुक्यातील पुनाडे ग्रामपंचायत हद्दीत हे धरण (बंधारा) १९९१ साली बांधले; मात्र या धरणाचे पाणी सिंचनासाठी उपयोगात येत नसल्यामुळे उरण पूर्व भागातील टंचाईग्रस्त आठ गावांना या धरणाचे पाणी पिण्यासाठी वापरण्याची योजना राबविण्याचा निर्णय रायगड जिल्हा परिषदेने घेतला. तेव्हापासून १.७५ एमसीएम एवढी पाण्याची क्षमता असलेले पुनाडे धरण उरणच्या पूर्व विभागातील पुनाडे, वशेणी, सारडे, पिरकोण, पाले, आवरे, गोवठणे, कडापे, पाणदिवे या गावांतील रहिवाशांची तहान पुनाडे नळ पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून भागवत आहे.

मात्र, मागील वर्षी कोकण किनारपट्टीवरील उरणसारख्या तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणात पाणीसाठा कमी प्रमाणात झाला आहे. त्यातच धरणातून होणारे पाण्याचे लिकेज, वाढती उष्णता यामुळे धरणातील पाणीपातळी झपाट्याने खाली गेली होती. त्यात भर पावसाळ्यातील जून महिन्यात उरण तालुक्यातील भागात पावसाने पाठ फिरविली असल्याने धरणातील उरलासुरला पाणीसाठा संपुष्टात येत असल्याने रहिवाशांना दुषित पाणी पुरवठा होत आहे. त्यातच माती मिश्रित पाण्यामुळे पंप बंद पडून पाणी पुरवठ बंद होत असल्याने भर पावसाळ्यात भीषण पाणी टंचाईचा सामना रहिवाशांना करावा लागत असल्याची ओरड रहिवाशांकडून ऐकण्यास मिळत आहे.
तरी रहिवाशांना भेडसावत असणारी पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच सदर रहिवाशांना टँकरने किंवा हेटवणे धरणातून पाणीपुरवठा करावा अशी मागणी पुनाडे आठ गाव ग्रा.नळ.पाणी पुरवठा कमिटीच्या अध्यक्षा तथा वशेणी ग्रामपंचायतीच्या सरपंच अनामिका हितेंद्र म्हात्रे यांनी उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी सारडे गावचे सरपंच, आवरे गावच्या सरपंच तसेच कमिटी सदस्य प्रशांत म्हात्रे, अमित म्हात्रे, संतोष पाटील उपस्थित होते.
उरण पुर्व विभागातील रहिवाशांना पुनाडे धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु जून महिना संपत आला तरी पाऊस पडला नाही. त्यामुळे उरला सुरला धरणातील जलसाठा संपुष्टात येत आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तरी शासनाने या घटनेचे गांभीर्य ओळखून रहिवाशांना तात्काळ टँकरने किंवा हेटवणे धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी पुढाकार घ्यावा
-अनामिका म्हात्रे
अध्यक्षा पुनाडे आठ गाव पाणीपुरवठा कमिटी तथा सरपंच, वशेणी ग्रामपंचायत