काँक्रीट भिंतीचे काम थांबवण्याचे नगरपालिकेचे आदेश!
मिलिंद माने
महाड : महाड एसटी स्थानकाच्या मागील बाजूस असलेली दगडी संरक्षक भिंत पाडून त्या ठिकाणी नवीन संरक्षक भिंत उभी करण्याचे काम सुरू आहे. या कामाची कोणत्याच प्रकारची परवानगी महाड नगर पालिकेकडून घेण्यात आलेली नाही, तसेच सदरचे बांधकाम नियोजित प्रारूप विकास आराखड्यानुसार नसल्याने हे बांधकाम त्वरित थांबवावे अशी मागणी रोहिदास नगर रहिवाशांनी केली आहे.
महाड एसटी स्थानकामध्ये गेली अनेक वर्ष अनयोजित कामे केली जात आहेत यामुळे ही कामे अल्पावधीतच नादुरुस्त होत आहेत. महाड स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेली दगडी संरक्षक भिंत पाडून या ठिकाणी काँक्रीटची भिंत उभी करण्याचे काम सध्या सुरू आहे. ज्या ठिकाणी जुनी भिंत होती त्याच ठिकाणी नवीन भिंत उभी करण्याचे काम केले जात असल्याने रस्ता रुंदीकरण, आगारातील पाण्याचा निचरा, नगरपालिकेच्या गटाराचा प्रश्न, उपस्थित झाला आहे यामुळे स्थानिक रोहिदास नगर रहिवाशांनी सदरचे काम बेकायदेशीर असून हे काम त्वरित थांबवावे अशी मागणी केली आहे.
छत्रपती शिवाजी. महाराज चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्यालगतच या काँक्रीट भिंतीचे काम सध्या सुरू आहे. या भिंतीमुळे भविष्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्ग रुंदीकरणाला अडथळा निर्माण होऊ शकतो. तसेच येथे गटार बांधणे देखील शक्य होणार नाही यामुळे आगारातील साचणारे पाणी देखील योग्य रीतीने निचरा होणार नसल्याने एसटी आगार प्रशासनाने नवीन प्रारूप आराखड्यानुसार बांधकाम करावे अशी मागणी रोहिदास नगर रहिवाशांनी केली आहे. याबाबत महाडचे प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापुरे यांना निवेदन सादर केले आहे. यावेळी माजी नगरसेवक प्रमोद महाडिक, रोहिदास तरुण विकास मंडळाचे अध्यक्ष प्रवीण चांदोरकर, दत्तात्रय केशव महाडिक, अनिल महाडिक, शिवाजी रामदास महाडिक, उमेश चिंतामणी महाडीक आदी उपस्थित होते. महाड नगरपालिकेने देखील सदरचे बांधकाम थांबवावे अशी सूचना एसटी महामंडळाला केली आहे.
महाड शहरातील संत रोहिदास नगर येथून छत्रपती शिवाजी महाराज. चौकाकडे जाणाऱ्या मार्गाच्या उत्तरेकडे सर्वे नंबर १२८ मधील सिटी सर्वे नंबर २०५५ व २०५६ या जागेच्या दक्षिण बाजूस महाड एसटी बस प्रशासनाकडून संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. या बांधकामाला महाड नगरपरिषदेने कोणतीच परवानगी दिलेली नाही. परवानगी न घेता हे काम सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने 1957 रोजी ही जागा आगाराकरिता संपादित केली आहे. 1957 रोजी संरक्षक भिंतीचे काम झाले आहे. महाड नगरपरिषदेने शहराच्या लोकसंख्येच्या वाढीचा विचार करून 1984 रोजी प्रारूप विकास आराखडा शासनाकडून मंजूर करून घेतला त्यानुसार 1957 रोजी बांधलेली संरक्षक भिंत आता प्रारूप विकास आराखड्यानुसार बांधणे आवश्यक होते.
महाड आगारांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत आहे. शिवाय छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील पावसाचे पाणी देखील येथील गटारात निचरा होत असते. या बांधकामामुळे आगारातील पाणी देखील योग्य निचरा होत नसून बांधकाम साहित्यामुळे सध्या अस्तित्वात असलेले गटार भरले गेले आहे. या ठिकाणी वळण असल्याने कायम वाहतूक कोंडी होते. तसेच एसटीच्या मोठ्या बसेस देखील कायम अडकून राहतात यामुळे सदरचे संरक्षक भिंतीचे काम प्रारूप मंजूर आराखड्यानुसार केले जावे अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
या ठिकाणी कायम वाहतूक कोंडी होते यामुळे एसटी महामंडळाने आपली संरक्षक भिंत प्रारूप विकास आराखड्यानुसार आत मध्ये घेणे आवश्यक आहे मात्र तसे न करता आणि कोणतीच परवानगी न घेता काम सुरू आहे. प्रमोद महाडिक, माजी नगरसेवक महाड एकंदरीत रहिवाशांनी तक्रार केल्यानंतरच नगरपालिका जागी होणार का? कि केवळ नगरपालिकेचे अधिकारी वातानुकूलित कार्यालयात बसून काम करीत असल्याने महाड शहरात व चौकाचौकात बेकायदेशीर अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना यामुळे अभय मिळत असल्याने महाड नगरी हे मागील दोन वर्षात नगरपालिकेच्या ढिशाळ कारभारामुळे बकाल बनली आहे. शहरातील अनेक ठिकाणी इमारत मालकांनी बेकायदेशीर रित्या इमारतीमध्ये फेरबदल करून व्यावसायिक पद्धतीचे गाळे बांधले असताना नगरपालिका प्रशासन डोळ्यावर काळीपट्टी बांधून का गप्प बसली आहे? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. मात्र, नागरिकांच्या सोयीसुविधांकडे लक्ष देण्याऐवजी अनधिकृत बांधकामदारांना व व राजकीय दबावाखाली महाड नगरपरिषद सध्या वावरत असल्याने स्वच्छ सुंदर असणारी नगरपरिषद सध्या बकाल झाल्याचे चित्र जागोजागी शहरात पाहण्यास मिळत आहे.