• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाड-मंडणगड रस्त्यावरील अर्धवट अवस्थेतील पुलामुळे नागरिकांचा जीव धोक्यात!

ByEditor

Jun 25, 2024

अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीच्या गैरकारभाराने नागरिक त्रस्त

मिलिंद माने
महाड :
महाड तालुक्यातून जाणाऱ्या महाड-मंडणगड-आंबडवे या रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे काम अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. मात्र, कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे महाड तालुक्यातील चिंभावे, चिंभावे-मोहल्ला, सुतार कोंड, वराठी-बौद्धवाडी, गोमेंढी-ताडवाडी या मार्गाला जोडणाऱ्या पुलाचे काम अर्धवट अवस्थेत ठेवल्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.

महाड रायगड रस्त्यावरील लाडवली गावाजवळील मांडले नदीवरील पुलाचे काम ज्याप्रमाणे अर्धवट अवस्थेत आहे त्याच पद्धतीने महाड मंडणगड रस्त्यावरील पुलाचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने ऐन पावसाळ्यात या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना नदीच्या पात्रातून प्रवास करावा लागत आहे. तर पुराचे पाणी जास्त असल्याने शाळा, कॉलेज व महाविद्यालयात जाणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

रायगड-महाड-मंडणगड-आंबडवे या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम ज्या अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे या कंपनीने ज्याप्रमाणे महाड ते रायगड रस्त्याच्या कामाची दुर्दशा केली आहे त्याच पद्धतीने शिरगाव फाट्यापासून रायगड जिल्ह्याची हद्द असणाऱ्या गोमेंडी गावापर्यंत जाणाऱ्या नागरिकांना निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे मागील तीन वर्षापासून नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

रायगड जिल्ह्याची हद्द असणाऱ्या गोमेंडी गावापासून छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडपर्यंत ५२ किलोमीटरचे काम तर गोमेंडी ते म्हाप्रळ फाटा ते मंडणगड १५ किलोमीटर हे सर्वच काम अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत करण्यात येत आहे. मात्र या कंपनीकडे पुरेशा प्रमाणात तांत्रिक मशिनरी उपलब्ध नाहीत, तरी देखील एवढ्या मोठ्या किलोमीटरचे काम या कंपनीला देण्यात आले आहे. कंपनीकडे असणाऱ्या तांत्रिक मशिनरीचा आवाका बघता या कंपनीकडून हे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण झालेच नाही. परंतु, जुन्या स्थितीतील चांगल्या दर्जाचा डांबरीकरणाचा रस्ता या कंपनीने जेसीबी, पोकलेनच्या साह्याने खरडून काढला. त्यामुळे आधीच खाडीपट्ट्यातील नागरिकांचा प्रवास धोक्याचा झाला असताना याच मार्गावरील तिन्ही पुलांची कामे अर्धवट अवस्थेत असल्याने नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत.

महाड-मंडणगड रस्त्यावरील तेलंगे चिंभावे येथील पुलाची कामे चालू असताना जो पर्यायी रस्ता दिला आहे तो नदीपात्रातूनच दिला आहे. पावसाळ्यात या नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी येते. या पाण्यातूनच एसटी व खाजगी वाहने वाट काढीत रस्ता पार करतात. मात्र, रात्रीच्या वेळेस स्थानिक नागरिकांना व शाळा महाविद्यालयातून पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र नदीच्या पात्रातूनच धोकादायक स्थितीत प्रवास करावा लागत आहे. तर नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी असल्यामुळे पुलाच्या कॉंक्रिटीकरणासाठी टाकण्यात आलेल्या लोखंडी जाळ्यांमधूनच अनेक शाळकरी विद्यार्थी व स्थानिक नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी जाणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात?

महाड-मंडणगड रस्त्यावरील चिंभावे गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असून या आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या सुमारे २५ गावातील लोकांना या पुलाच्या अर्धवट अवस्थेत असलेल्या कामामुळे जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. आधीच व्याधीने त्रस्त असलेले नागरिक उपचारासाठी चिंभावे प्राथमिक आरोग्य केंद्रात जात असताना रस्त्याच्या दुसऱ्या व्याधीने त्यांना प्रवास करताना जीवावर उदार होऊन प्रवास करावा लागत आहे. मात्र, अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीच्या ढिसाळ कारभाराकडे राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या दुर्लक्षामुळे रायगडच्या पायथ्यापासून गोमेंडीपर्यंत ५२ किलोमीटर अंतरामधील नागरिकांना वेदना सहन कराव्या लागत आहेत. पावसाळा सुरू झाल्यापासून महाड मंडणगड मार्गाची दुरवस्था झाली आहे. या मार्गावरून वाहन चालवणे कठीण झाले आहे. पावसाळ्यात काम थांबणार असल्याने तात्पुरती डागडुजी होणे गरजेचे आहे, तरी महामार्ग विभागाने याकडे लक्ष घालणे गरजेचे आहे.

मंडणगड-म्हाप्रळ-महाड मार्गाची अवस्था लय बिकट झाली आहे. या मार्गावर रावढळपासून मुठवली गाव हद्दीपर्यंत रस्ता फुटला आहे. तेलंगे गाव हद्दीत सुरू असलेल्या पुलाचे काम अर्धवट असल्याने त्या ठिकाणचा पर्यायी मार्ग धोकादायक बनला आहे. या मार्गावर वाहन चालवणे कठीण झाले आहे. वाहनांचे मोठे नुकसान होत आहे.

-फिरोज देशमुख (अण्णा)
अध्यक्ष, मिनीडोर संघटना.

राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी सुस्तावले?

महाड-मंडणगड रस्त्याच्या दुरवस्थेला अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनी जबाबदार असताना या कंपनीवर मेहेरबान होण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या महाड येथील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने होत असल्याने याचा नाहक त्रास या परिसरातील नागरिकांना होत असताना देखील राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अभियंता आकांक्षा मेश्राम या नागरिकांनी केलेल्या तक्रारीची कोणतीही दखल घेत नसल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या महाड येथील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!