विठ्ठल ममताबादे
उरण : तालुक्यात उन्हाळ्यात व आत्ता पावसाळ्यात उरण विद्युत मंडळाने विजेचा प्रवाह सतत खंडित करून नागरिकांच्या भावनांशी खेळ मांडला आहे. हजारो नागरिकांच्या वाढत्या तक्रारींचा विचार करून शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उरण एमएसईबी कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा आयोजित केला आहे. उरण तालुक्यातील एमएसईबी कार्यालयात शेकाप उरण तालुका चिटणीस विकास नाईक यांनी अर्ज देऊन तसे जाहीर केले आहे. शेकाप ज्येष्ठ नेते प्रा. एल. बी. पाटील, उरण महिला चिटणीस सीमा घरत, रमाकांत पाटील, शहर महिला अध्यक्षा नयना पाटील, सिताराम नाखवा, विनोद पाटील, रंजना पाटील आदी शेकाप कार्यकर्ते उपस्थित होते.
तालुक्यातील गावागावांतील विजेचे बरेच खांब जीर्ण झाले आहेत, विजेच्या तारा तुटल्या आहेत, पावसाळ्यात तारा पडून मोठी जीवितहानी घडण्याची दाट शक्यता आहे. तसेच ग्राहकांना दिली जाणारी भरमसाठ बिले यामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. लोकांमध्ये असंतोष माजला आहे. नागरिकांना न्याय मिळविण्यासाठी हा मोर्चा निघणार आहे. आता हा मोर्चा जोरदार काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी गावोगाव पुढच्या आठवड्यापासून प्रचार सुरू करण्याचे आयोजन केले आहे.