पर्यटन स्थळावर १४४ कलम लागू केल्याने पावसाळी पर्यटनाला बसला आळा
सलीम शेख
माणगाव : डोंगर दऱ्यातून उंच नागमोडी वळण घेत फेसाळणारे धबधबे लहानांपासून मोठ्यापर्यत आकर्षित करून घेतात. त्यामुळे सर्वच जन आले सुख दुख: विसरून या निर्सगाच्या प्रेमात पडतात त्यात नवल नाही. धबधब्यांचे, डोंगर दरीत फिरण्याचे आणि पावसाळी पर्यटनाचे. अनेकजण पावसाळी विरंगुळा व हौस म्हणून धबधब्यांना जवळ करतात व मनसोक्त भिजण्याचा आनंद पर्यटक घेतात. मात्र जून महिन्यातच पर्यटकांच्या जीवाचा विचार करून या परिसरात कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून माणगाव उपविभागीय अधिकारी यांनी या पर्यटन स्थळावर १४४ कलम लागू करून मनाई आदेश काढला त्यामुळे पर्यटकांच्या उत्साहावर निरूत्साचे पाणीच पडले आहे. मात्र पर्यटनावर निर्बंध घातल्याने इथले व्यावसायिकाना फटका बसला आहे.
पंधरा दिवसापासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे माणगाव-पुणे मार्गावरील कोंडेथर गावचे हद्दीतील ताम्हिणी घाटातील उंच डोंगरावरून वाहणारे फेसाळ धबधबे पुन्हा फुलू लागले आहेत मात्र या धबधब्याकडे पर्यटकांनी पाठच फिरवली आहे. त्यामुळे तेथील स्थानिक उद्योग धंदे, व्यावसायिकावर उपास मारीची वेळ आली आहे. डोंगरावरून पडणाऱ्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात धबधबे तयार झाले आहे. त्यातच धरण, नदी परिसर हे पावसाळी दिवसात पर्यटनाचे केंद्र ठरतात. जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील अनेक पर्यटक पावसाळी दिवसांचा आनंद घेण्यासाठी खास ताम्हिणी घाट, भिरा देवकुंड, सिक्रेट पॉईंट या पर्यटन स्थळावर आवर्जून येतात. यातून स्थानिकांना रोजगार मिळतो. पर्यटनाला चालना मिळते. प्रतिवर्षी पावसाळ्यात ताम्हिणी घाट हा रायगडसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील पर्यटकांचे मोठे आकर्षण ठरते.
ताम्हिणी घाटातील नैसर्गिक रचनेमुळे पावसाळ्यात या ठिकाणी सुंदर असे परिसर व मोठमोठाले धबधबे निर्माण होतात. त्यामुळे ताम्हिणी घाट हा पावसाळी पर्यटनाची पर्यटकांची मोठी पसंती असते. पावसाळी पर्यटनाच्या निमित्ताने स्थानिक लोकांना विविध प्रकारचा रोजगार उपलब्ध होतो. चहा टपरी, मके विक्री इत्यादी इत्यादी खाद्यपयोगी वस्तूंना या वेळी चांगली मागणी असते व अनेकजणांना या निमित्ताने रोजगार उपलब्ध होतो. बंदीमुळे पर्यटकांनी धबधब्याकडे पाठ फिरवली आहे. यामुळे पावसाळी पर्यटनाला मोठा फटका बसत असून स्थानिकांची रोजीरोटी बुडत आहे. पावसाळी पर्यटनाच्या निमित्ताने दुर्गम भागात होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी या परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये मनाई आदेश माणगाव उपविभागीय अधिकारी यांनी लागू केले असून १० जून ते ३१ ऑक्टोबर २०२३ या दिवसांत मनाई आदेश जारी केला आहेत. तसेच पावसाळी दिवसांत धबधबे परिसरामध्ये मद्यपान करणे, मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, अनधिकृत मद्यविक्री करणे व उघड्या जागेवर मद्य सेवन करणे, पावसामुळे धोकादायक झालेल्या ठिकाणी धबधबे, कठडे, धोकादायक वळणे आधी ठिकाणी सेल्फी काढणे व कोणत्याही स्वरूपाचे चितरीकरण करणे अशा प्रकारचे वर्तन करण्यास प्रशासनाने बंदी केली आहे. सिक्रेट पॉईंट, ताम्हिणी घाट, दुर्गम धबधबे घाट इत्यादी ठिकाणी पर्यटन स्थळे मनाई आदेश जारी करण्यात आले आहे.