प्रतिनिधी
रायगड : ‘माझा एकलेपणा’ (चारोळी संग्रह), ‘अक्षरबंध’ (हायकू संग्रह), ‘गोष्ट तुझी माझी’ (लघुकथा संग्रह), ‘जगलेल्या कविता’ (काव्यसंग्रह) अशा विविधांगी आणि पुरस्कार प्राप्त पुस्तकांचे लेखन करणाऱ्या वैभव धनावडे ह्यांच्या ‘निलाक्षरे’ या काव्यसंग्रहास नुकताच ‘विं. दा करंदीकर शब्दशिल्प’ पुरस्काराचे वितरण सुप्रसिद्ध साहित्यिक आणि साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त लेखक एकनाथ आव्हाड, सुप्रसिद्ध मराठी दिगदर्शक सचिन गोखले, नामवंत पत्रकार पंकज दळवी, हिरकणी गीतांजली वाणी (शब्दशिल्प कलाविष्कार संघ कार्याध्यक्षा), महा संयोजिका सोनाली जगताप, विशेष अतिथी राजश्री बोहरा, अनिता गुजर आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत नॅशनल लायब्ररी ऑफ बांद्रा येथे पार पडलेल्या साहित्य संमेलनात करण्यात आले.
सदर राज्यस्तरीय साहित्यसंमेलनात मराठी साहित्य विश्वात भर घालणाऱ्या विशेष निवडक पुस्तकांचा सन्मान करण्यात आला. ‘निलाक्षरे’ पुस्तकाच्या माध्यमातून स्त्री जीवनाचे प्रतिबिंब उमटले असून सामान्य गृहिणींचा संघर्ष काव्यमय स्वरूपात वाचकांच्या हाती उपलब्ध झाला आहे. महिलांना सकारात्मक विचार देणारा हा काव्यसंग्रह महिला वर्गात अधिक वाचला जात आहे. वैभव धनावडे हे अभियंता म्हणून कार्यरत आहेत. मराठी भाषेसाठी झटणाऱ्या विविध भागातील विविध आणि स्तरांतील लोकांना एकत्र घेऊन त्यांनी साहित्यसंपदाची स्थापना केली आहे. राज्यस्तरीय साहित्य संमेलनं, विविध कार्यशाळा, साहित्य क्षेत्राशी निगडित असणारे विविध उपक्रमांमध्ये सहभाग आणि यशस्वी आयोजन ह्यात त्यांचा हातखंड आहे.
साहित्यसेवा करत असताना आपण समाजाचे देणे लागतो ह्या भावनेतून पूरग्रस्तांना, अनाथालय, वृद्धाश्रम येथे मदतीचा हात त्यांनी वेळोवेळी दिला आहे. वाचन संस्कृतीस चालना मिळावी म्हणून आदिवासी पाड्यावर वाचनालय स्थापना, मराठी भाषा संवर्धन आणि भावी पिढीला साहित्याची गोडी लागावी म्हणून संस्कारसंपदा असे अभिनव उपक्रम त्यांच्या संकल्पनेतून पार पडताना आढळतात. लेखकांना रास्त किंमतीत उत्तम दर्जाची पुस्तके प्रकाशित करता यावीत म्हणून त्यांनी साहित्यसंपदा प्रकाशनाची निर्मिती केली असून आजपर्यंत ८०हुन अधिक पुस्तकांची निर्मिती पार पडली आहे. साहित्यसेवेच्या माध्यमातून वाचन संस्कृतीस हातभार लागावा म्हणून करत असलेल्या त्यांच्या कार्याचा गौरव “वाचन संस्कृती संवर्धन पुरस्कार २०२२” देऊन करण्यात आला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी केलेले कार्य लक्षात घेऊन त्यांना कोकण विभागस्तरीय ‘निसर्गमित्र पुरस्कार २०२३’ प्राप्त झाला आहे
रायगडमधील साहित्य आणि समाज क्षेत्रातील तरुण चेहरा म्हणून त्यांची ओळख उदयास येत असून, समाजातील सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.