• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने पिपाणी निवडणूक चिन्ह गोठविले; शरद पवारांना दिलासा!

ByEditor

Jul 19, 2024

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना मतदारसंघात तुतारीचे बॅनर लावण्याच्या पक्षाच्या सक्त सूचना

मिलिंद माने
मुंबई :
सन 2024 ची विधानसभा निवडणूक राज्यात मोठ्या प्रमाणावर रंगतदार ठरणार असून सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच पक्ष व्ह्यूव रचना करत आहेत. तर अजून दोन महिन्याचा कालावधी असताना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने मतदार संघात तुतारीचे बॅनर लावण्याच्या सक्त सूचना उमेदवारांना दिल्या आहेत. त्यातच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्ह गोठविल्याने शरद पवारांना दिलासा मिळाला आहे.

राज्यात 2024च्या विधानसभा निवडणुका ऑक्टोबर महिन्यामध्ये होणार आहेत. या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यास अजून दोन महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. तोपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी व लागलेल्या बॅनरचा खर्च संभाव्य उमेदवारावर लागणार नसल्याने पक्षाची निशाणी उमेदवारासहित जनतेच्या मनात कायम राहणार असल्याने ही अभिनव कल्पना अंमलात आणण्याच्या सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा निवडणुकीसाठी ज्यांना उमेदवारी दिली जाणार आहे त्यांना दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्ह हे अजित पवार गटाला मिळाले. त्यानंतर प्रथमच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केले. या चिन्हावर शरदचंद्र पवार गटाने नुकत्यात झालेल्या लोकसभा निवडणुका लढवल्या होत्या. या निवडणुकीत शरदचंद्र पवार गटाला राज्यात आठ जागी विजय संपादन करता आला. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आत्तापासूनच रणनीती ठरविण्यास सज्ज झाला आहे.

पिपाणी व तुतारी यातील संभ्रमावस्था दूर करण्याचा प्रयत्न!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर शरद पवारांना सोडून अनेक आमदार अजित पवार गटात समाविष्ट झाले. त्यातील नऊ जणांना मंत्रिपदाची संधी मिळाली तर काही आमदारांना मतदारसंघातील कामांकरिता करोडो रुपयांचा निधी वाटप करण्यात आला. मात्र, त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गट व शरदचंद्र पवार गट या दोन्ही गटातील उमेदवार लोकसभा निवडणुकीसाठी उभे होते. अजित पवार गटाकडून केवळ 32 रायगड लोकसभा मतदारसंघातील सुनील दत्तात्रय तटकरे हे एकमेव उमेदवार निवडून आले. मात्र, शरद पवारांनी आपले कौशल्य पणाला लावून व महाराष्ट्रात पायाला भिंगरी लावून फिरल्याने आठ जागांवर त्यांना विजय संपादन करता आला.

बारामती लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या सुप्रिया सुळे या त्यांच्या कन्ये विरोधात तुतारी चिन्हा सारखे साधर्म्य असणाऱ्या पिपाणी या चिन्हावर एका अपक्ष उमेदवाराने निवडणूक लढवली. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात मतांचा फटका बसला. तो फटका लोकसभा निवडणुकीत असल्याने फारसा फरक पडला नाही. मात्र, विधानसभा निवडणुकीत याचा मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याने याची गंभीर दखल शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी घेऊन पिपाणी चिन्ह गोठवण्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते. त्याची केंद्रीय निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेऊन आज अखेर पिपाणी चिन्ह गोठवण्याचा निर्णय जाहीर केला.

बारामती लोकसभा मतदारसंघात पिपाणी या चिन्हामुळे तुतारी चिन्हावर उभे असलेल्या सुप्रिया सुळे यांना काही प्रमाणात मतांचा फटका बसला, तर सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उदयनराजे भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांना देखील पिपाणी या चिन्हावर एका उमेदवाराने निवडणूक लढविल्याने पिपाणी चिन्हाचा फटका बसल्यामुळे त्यांचा पराभव झाला. तो फटका विधानसभा निवडणुकीत बसू नये कारण विधानसभा निवडणुकीत एखाद्या गावात किंवा एखाद्या महानगरपालिका क्षेत्रातील वॉर्डात 1000 मतांचा फटका बसला तर पुढील गावात अथवा पुढील वॉर्डात तो भरून काढताना मोठी तारेवरची कसरत करावी लागते. याचा अनुभव शरदचंद्र पवार यांना असल्याने त्यांनी आता ताक देखील फुंकून पिण्याचे ठरवले आहे.

त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून निवडणूक लढवणाऱ्या संभाव्य उमेदवारांना आत्तापासूनच गावागावात व नाक्या नाक्यावर पक्षाचे बॅनर व त्या बॅनरवर मी या पक्षाचा विधानसभा निवडणुकीचा उमेदवार आहे, माझी निशाणी तुतारी आहे अशा आशयाचे बॅनर लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वी राज्यातील 288 मतदार संघापैकी शरदचंद्र पवार गट ज्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे तिथे तुतारी पक्षाचे बॅनर गावागावात व नाक्या नाक्यावर पाहण्यास मिळणार असून यामुळे पंचवीस टक्के प्रचाराची मजल गाठता येणार असल्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!