वृत्तसंस्था
मुंबई : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी महायुतीने नियोजनबद्ध कार्यक्रम आखला होता. त्यानुसार, विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फोडून महायुतीने आपल्या सर्वच 9 उमेदवारांना विजयी केले. विशेष म्हणजे महायुतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे कमी मतं असतानाही त्यांचे दोनही उमेदवार विजयी झाले. विशेष म्हणजे शरद पवार यांनी पुरस्कृत केलेले शेकापचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला. त्यामुळे, काँग्रेसची 7 मतं फुटल्याचा आरोपही झाला आणि ते मतं फुटली हेही उघडकीस आलं. मात्र, काँग्रेसची नेमकी फुटलेली मतं कोणती, त्यांच्यावर काय कारवाई होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. विशेष म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही संबंधित आमदारांवर कारवाईचे संकेत दिले आहेत. त्यातच, क्रॉस व्होटिंगचा आरोप असलेल्या काँग्रेसच्या 2 नेत्यांनी महायुतीमधील शिवसेना व भाजपमधील प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्यामुळे दोन आमदार फुटणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेसची 7 मतं फुटल्याची चर्चा आहे. काही आमदारांनी क्रॉस व्होटींग केलं असून या आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील आनंदाश्रमात भेट घेतली. विशेष म्हणजे या भेटीनंतर आमदार हिरामण खोसकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं तोंडभरून कौतुक केलं आहे. दुसरीकडे काँग्रेस नेते आणि नांदेड जिल्हयातील देगलूर मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर हेही भाजपच्या गोटात दिसून आले आहेत. भाजप नेते संजय उपाध्याय यांची भेट घेतल्यानंतर आता त्यांनी गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधत भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली आहे. दोघांची भेट घेण्याअगोदर आमदार अंतापूरकर यांनी मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली असल्याची खात्रीलायक माहिती आहे. आता या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे विधानपरिषद निवडणुकांमध्ये अंतापूरकर यांच्यावरही क्रॉस व्होटिंगचा आरोप आहे.
अशोक चव्हाण यांनी मतं फोडल्याची चर्चा
दरम्यान, फुटीरवादीचा आरोप असलेल्या आमदारांवर कारवाईऐवजी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतल्याची सुत्रांची माहिती असून विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या 7 आमदारांवर विधानसभा निवडणुकीपर्यंत कारवाई होणार नसल्याची माहिती आता समोर येत आहे. त्यामुळेच, संबंधित आमदारांनी महायुतीमधील नेत्यांशी संपर्क साधत जवळीक वाढवल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. काँग्रेसने उमेदवार प्रज्ञा सातव यांना पहिल्या पसंतीची 28 मते दिली होती. या 28 पैकी 3 आमदारांनी सातव यांना मतदान न करता महायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेसने मिलिंद नार्वेकर यांना सहा मते दिली होती. यातील एक मत फुटल्याचाही संशय व्यक्त केला जातोय.अशोक चव्हाण यांच्याबरोबर असलेले काही आमदार तसेच अन्य काही आमदारांची मतं फुटल्याचे म्हटले जात आहे.