अनंत नारंगीकर
उरण : यशश्री शिंदे या उरणमधील तरुणीची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. या दुदैवी घटनेने उरण तालुका हादरुन गेला आहे. या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी शिंदे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आपली उपस्थिती दर्शविली आहे. यावेळी संवाद साधताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले की, पोलीस यंत्रणा तपास करत असून आरोपीला कठोर शिक्षा होणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. त्यात कोणत्याही प्रकारचे राजकारण करु नये.

यशश्री शिंदे या तरुणीची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी उरण शहरातील बाजारपेठ रविवारी (दि. २८) बंद ठेवण्यात आली होती. तसेच सोमवारी (दि. २९) कोप्रोली गाव परिसरात ग्रामस्थांच्यावतीने कडकडीत बंद पाळण्यात आला होता. यशश्री शिंदे घटनेसंदर्भात सर्व स्तरातून निषेध केला जात आहे. अशा दुदैवी घटनांना लगाम बसवा आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी विविध पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी पोलीस यंत्रणेशी संपर्क साधून मागणी केली. तसेच शिंदे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आपली उपस्थिती दाखवली आहे.

सदर घटनेचे गांभीर्य ओळखून उरणचे आमदार महेश बालदी यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. तसेच माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना उरण शहरातील घटनेची माहिती देऊन आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस यंत्रणा कशा प्रकारे तपास करत आहे याची माहिती घेऊन शिंदे कुटुंबियांना त्यांच्या घरी जाऊन आधार देत त्यांचे सांत्वन केले. यावेळी आमदार महेश बालदी, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम, पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे यांच्यासह इतर अधिकारी तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनीही यशश्री शिंदे हीच्या मारेकऱ्यांना लवकरच लवकर अटक करुन कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी लावून धरली आहे.