सलीम शेख
माणगाव : मुंबई गोवा महामार्गाचे काम मागील १४ वर्षापासून रखडले आहे. कोकणातील सर्व जनतेला या महामार्गावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या महामार्गावर आजपर्यंत एकूण ३००० ते ३५०० कोकणकरांना आपला प्राण गमवावा लागला आहे. तर दहा हजारपेक्षा जास्त कोकणकर जखमी झाले आहेत. त्यात कित्येक गंभीर जखमी तर कित्येक कायमचे जायबंदी झालेत. ३१ मे २०२३ पर्यंत मुंबई गोवा महामार्गाची एक मार्गिका पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या वतीने देण्यात आले. परंतु, जुलै २०२४ उजाडून देखील अद्यापही कोकणकरांचा प्रवास सुखकर झालेला नाही. अद्याप संपूर्ण रस्त्याचे खड्डे भरलेले नाहीत आणि त्यातही जे काही डांबरीकरण काम केलं गेलं ते दोन महिने सुध्दा टिकलेले नाही अश्या पद्धतीने काम केलेले आहे.
सद्यस्थितीत महामार्गाची अवस्था अतिशय दयनीय असून महामार्ग निव्वळ मृत्युचा सापळा बनत चालला आहे. महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असल्याने प्रवाशी व वाहनचालक यांना वाहने चालवताना जीवाची कसरत करावी लागत आहे. यातच अधिक भर म्हणजे करण्यात आलेले काँक्रिटीकरणाचे काम कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता निकृष्ठ दर्जाचे करण्यात आले आहे. परशुराम घाट व कशेडी बोगदा या ठिकाणी जीवघेणी परिस्थिति आहे. तर महामार्गावर अनेक ठिकाणी ड्रेनेज लाइन नसल्याने पाणी साचत आहे. आजपर्यंत सर्व सरकार, सर्व मंत्री हे काम करण्यास अपयशी ठरले आहेत. अधिवेशनात स्वतः मंत्री महोदय यांनी नवीन ठेकेदार नेमले असून काम प्रगती पथावर आहे असे उत्तर दिले. परंतु, अनेक ठिकाणी काम बंद आहे व कधीपर्यंत प्रगती पथावर राहिल याची शाश्वती नाही. समस्त कोकणकर गेली दीड वर्षांपासून जन आक्रोश समितीमार्फत सतत महामार्गाच्या समस्या सरकार दरबारी मांडत आले आहेत. तरी या कामात कोणतीही प्रगती आढळून येत नसल्याने दि. २८ जुलै रोजी माणगाव येथे होमहवन करण्यात आले. तसेच दिनांक १५ ऑगस्टपासून आमरण उपोषण देखील करण्यात येणार आहे.
यावेळी इंदापूर व माणगाव बायपास लवकरात लवकर पूर्ण करणे, मुंबई गोवा महामार्गावर ६१००.४४ कोटी मंजूर असताना निधी अभावी मागील १४ वर्षांपासून रखडलेला महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा व १४५ कोटी खड्डे भरण्यासाठी खर्च होऊन देखील महामार्गावरील असलेले खड्डे त्वरित भरण्यात यावेत. महामार्गावर अपघातात आतापर्यंत १८७६ मृत्यु झाल्याची माहिती मंत्री महोदय यांनी पावसाळी अधिवेशनात दिली. परंतु, मृत्यूमुखी पडलेल्या व जखमी झालेल्या कोकणकरांच्या नातेवाईकांना अद्यापही मदत देण्यात आलेली नाही ती त्वरित देण्यात यावी, मुंबई गोवा महामार्गावर होणाऱ्या अपघाताला शासन, प्रशासन, ठेकेदार व अडवणूक करणारे लोकप्रतिनिधी जबाबदार असून त्यांची सखोल चौकशी करून या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा व कामात दिरंगाई केल्याबाबतचे गुन्हे दाखल करून समस्त कोकणकरांना न्याय द्यावा जेणेकरून भविष्यात असे अडथळे निर्माण होणार नाहीत. मुंबई गोवा महामार्गाची श्वेतपत्रीका काढण्यात यावी, सदर महामार्ग पळस्पे ते झाराप पूर्ण मोराथच्या नियमानुसार जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा टोल आकारु नये, मुंबई गोवा महामार्ग अपघातास कारणीभूत ठरत असल्याने मुंबई पुणे द्रुतगती महामार्गांवर कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल आकारू नये, महामार्गांवर युद्धपातळीवर काम करून ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात यावे, महामार्गावरील सर्व ब्रिज व घाट परिसरातील झालेल्या कामांवर थर्ड पार्टी ऑडीट करण्यात यावे, परशुराम घाटातील परिस्थीती दरवर्षी जीवघेणी ठरत असून यावर मार्ग काढण्यात यावा, कशेडी बोगद्याचे एक बाजूचे काम करण्यात आलेले आहे परंतु, सदर काम देखील निकृष्ठ दर्जाचे असून बोगद्यात पाण्याची गळती होत आहे. चिपळुणमधील काम अजुनही बरेचसे बाकी असून सदर ठिकाणचे काम निकृष्ठ दर्जाचे आहे, ते लवकर व उत्तम दर्जाचे करून पूर्ण करावे. आरवली ते वाकेड येथील महामार्गाची परिस्थिति अजुनही दयनीय आहे. तसेच ड्रेनेज लाईन नसल्याने महामार्गावरील पाण्याचा लोट स्थानिकांच्या घरात जात असून याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ पनवेल ते इंदापूरच्या रस्ता रुंदिकरणाच्या कामात पाटणी ते आनंदनगर येथील शेतकऱ्यांच्या सुपीक शेती लगत केलेल्या भरावामुळे शेतीचे पाणी जाण्याचा मार्ग बंद झाला असल्याने सुपीक शेतीचे अनेक वर्षापासुन होणारे नुकसान याबाबत भरपाई मिळावी व भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी पक्का नाला बांधून मिळावा अशा विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी जनआक्रोश समिती पदाधिकारी व नागरीक उपस्थित होते.