• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कळंब-कर्जत राज्य मार्गावर कळंब पुलालगत रस्ता खचला; पूल बनला धोकादायक!

ByEditor

Jul 29, 2024

रस्ते विकास महामंडळाकडून होणार स्ट्रक्चरल ऑडिट

गणेश पवार
कर्जत :
कर्जत-मुरबाड-शहापूर या राष्ट्रीय महामार्गावर कळंब येथे पोश्री नदीवर जुना पूल आहे. या पुलाजवळ रस्ता खचला असून पुलावरून वाहतूक धोकादायक बनली आहे. हि बाब प्रशासनाला समजताच त्यांनी संबंधित ठिकाणी सुरक्षा जाळी लावली आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग असल्याने येथून अवजड वाहतूक होते. तेव्हा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याची भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. संबंधित पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आली आहे.

कर्जत-मुरबाड या राष्ट्रीय महामार्गाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या माध्यमातून आजही सुरूच आहे. अशात रस्त्याचे काम करताना या मार्गावरील अनेक पूल हे तसेच ठेवण्यात आले आहेत. नव्याने रस्ते होत असताना पूल देखील नव्याने बांधले जाणे आवश्यक असताना ते तसेच वापरले जात आहेत. कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर कर्जत तालुक्यातील कळंब गावानजीक पोश्री नदीवर सन १९६४- ६५ मध्ये पूल बांधण्यात आला होता. या पुलावरून सुरुवातीच्या काळात अवजड वाहतूक होत नव्हती. मात्र, आता या पुलाने रायगड, ठाणे आणि नाशिक जिल्हा जोडला जात असून अवजड वाहनांची रहदारी या रस्त्यावरून होत असते. जेएनपीटी, मुरबाड औद्योगिक क्षेत्र, खोपोली, पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील माल वाहतूक याच रस्त्यावरून होत असते. हा रस्ता चांगला तसेच जवळचा असल्याने या रस्त्यावरील जड वाहनांची वाहतूक लक्षणीय आहे. तर या पुलाचे साधे स्ट्रक्चरल ऑडिट देखील अद्याप करण्यात आले नाही. परिणामी कर्जत तालुक्यात गेले काही दिवस होत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका या पुलाला देखील बसला आहे.

पुलाजवळील रस्ता खचला असून खालच्या बाजूने पूर्णतः माती निघून गेली आहे. हि बाब रात्री लक्षात आल्यावर कळंब ग्रामपंचायत सरपंच प्रमोद कोंडिलकर, प्रसाद बदे, हनुमान बदे, रवींद्र बदे, संतोष राऊत, गणेश मानकामे यांनी या ठिकाणी थांबत तात्काळ प्रशासनाच्या लक्षात हि बाब आणून दिली. त्यामुळे प्रसंगाचे गांभीर्य ओळखत कळंब पोलीस चौकी येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी याठिकाणी बॅरीगेट लावले. सरपंच प्रमोद कोंडेकर यांनी याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला देखील कळवले असून सुरक्षेच्या दृष्टीने स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी केली आहे.

दरम्यान कळंब गावातील सतर्क नागरिकांमुळे रस्ता खचला असल्याची बाब लक्षात आली. ग्रामस्थांनी नव्या पुलाची देखील मागणी केली आहे. तेव्हा येथील जुना असलेला पूल नव्याने कधी निर्माण होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

काल रात्री गावातील मुलांचे फोन आले कि पूल खचला आहे. त्यामुळे लगबगीने तिथे पोहचलो. जागेवर जाऊन पहिले असता पुलाला जोडणाऱ्या रस्त्याची माती खालून पूर्णपणे वाहून गेलेली होती. त्यामुळे मुलांना तिथे थांबवून तातडीने पोलीस अधिकारी, महसूल प्रशासन यांना माहिती दिली. तेव्हा पोलीस कर्मचाऱ्यांनी तिथे सुरक्षेच्या दृष्टीने बॅरीगेट लावले. खरं पाहता राष्ट्रीय महामार्ग असल्याने येथे नव्या रस्त्यासोबत नव्याने पुलाची देखील निर्मिती करणे गरजेचे होते. कळंब येथील पोशीर नदीवरचा हा पूल खूप जुना आहे. तर राष्ट्रीय महामार्ग असल्याने येथून जड वाहतूक कायम सुरु असते. तेव्हा या पुलाचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करावे तसेच नवीन पूल उभारावा अशी आमची मागणी आहे.
-प्रमोद कोंडिलकर,
सरपंच कळंब ग्रामपंचायत.

कळंब येथील पोश्री नदीवरील पुलाजवळ रस्ता खचला असल्याची माहिती मिळाली. याबाबत तेथील दुरुस्तीचे आदेश ठेकेदाराला दिले आहेत. मात्र, पाऊस खूप असल्याने कामात अडचणी येत आहेत. तसेच या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट देखील आम्ही करणार आहोत.
-संदीप पाटील,
कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!