ग्रामपंचायती बरोबर प्रकल्प आणि रहिवाशी संकुलामधील केरकचरा रस्त्यावर
अनंत नारंगीकर
उरण : स्वच्छ भारत अभियानाचे उरणच्या ग्रामपंचायतींनी तीनतेरा वाजवले आहेत. गावातून गोळा केलेला कचरा रहदारीच्या रस्त्यांवर टाकून या ग्रामपंचायतीबरोबर प्रकल्प आणि सिडको हद्दीतील रहिवाशी संकुलातील रहिवाशांनी रस्त्यांचे डंपिंग ग्राउंड केल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. अशा कचऱ्यामुळे पावसाळ्यात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी उरण तहसीलदार डॉ. उध्दव कदम आणि उरण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस. पी. वाठारकर यांनी जनतेच्या आरोग्याशी निगडित प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी जनमानसातून करण्यात येत आहे.

अरबी समुद्राच्या कुशीत वसलेला व निसर्ग संपन्न डोंगर रांगांच्या गर्द हिरव्या छायेत बसलेला उरण हा मुंबई व नवीमुंबई शहरांचा श्वास म्हणून ओळखला जाणारा तालुका आहे. मात्र, या तालुक्यात असणाऱ्या ग्रामपंचायती बरोबर प्रकल्प आणि सिडको हद्दीतील रहिवाशी संकुलातील कचरा रहदारीच्या रस्त्यांवर टाकला जात आहे. त्यामुळे रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या जनतेचा श्वास कोंडला गेला असुन नाक मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. सध्या पावसाळ्यात मोठया प्रमाणात केर कचरा हा चिरनेर-कोप्रोली, चिर्ले-दिघोडे, पिरवाडी- चारफाटा, द्रोणागिरी नोड तसेच तालुक्यातील इतर रस्त्यावर टाकला जात आहे.

पावसाळ्यात कुजलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे या दुर्गंधीने साथीचे रोग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.एकंदरीत शासन स्वच्छतेकडे लक्ष केंद्रित करत असताना गावातील ग्रामपंचायत, प्रकल्प आणि सिडको प्रशासन स्वच्छतेचे तीनतेरा वाजवीत असून जनतेच्या आरोग्याशी खेळत आहे.तसेच ग्रामस्वच्छतेसाठी आग्रही असणारे महसूल विभाग, पंचायत समिती प्रशासन सुद्धा या अस्वच्छ कारभाराला प्रतिबंध करीत नसल्याने जनतेत संताप व्यक्त होत आहे. तरी उरण तहसीलदार डॉ उध्दव कदम आणि उरण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस. पी. वाठारकर यांनी जनतेच्या आरोग्याशी निगडित असलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी जनमाणसातून करण्यात येत आहे.
रहिवाशांच्या रहदारीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गाव परिसरातील तसेच सिडको संकुलातील, प्रकल्पातील केरकचरा गोळा करुन टाकला जात आहे. त्यामुळे पावसाळ्यात मोठया प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. त्याचा परिणाम हा रहिवाशांच्या आरोग्यावर होत आहे. तरी स्थानिक ग्रामपंचायत, सिडको, तहसील, पंचायत समिती, रायगड जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी यांनी सदर घटनेचे गांभीर्य ओळखून तालुक्यातील गोळा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट योग्य ठिकाणी लावण्यासाठी पुढाकार घ्यावा.
–शिवाजी ठाकूर
सामाजिक कार्यकर्ते, भेंडखळ.