• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पेव्हर ब्लॉकने भरलेले खड्डे गणपतीपूर्वी राहतील का?

ByEditor

Aug 3, 2024

रायगड जिल्हा वाहतूक सेनेचे अध्यक्ष सुभाष मोरे यांचा राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांना सवाल

मिलिंद माने
महाड :
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील खड्ड्यांना पेव्हर ब्लॉकचा मुलामा देण्याचे काम सध्या जोमाने चालू आहे. हे पेव्हर ब्लॉक गणपतीपूर्वी व्यवस्थित राहतील का? असा सवाल या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या असंख्य वाहन चालकांसहित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रायगड जिल्हा वाहतूक सेनेचे अध्यक्ष सुभाष मोरे यांनी राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांना विचारला आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सलग १७ वर्ष कोकणातील चाकरमान्यांनी खड्ड्यातून प्रवास केला आहे. तशीच परिस्थिती यावर्षी देखील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची झाली आहे. पळस्पे फाट्यापासून कशेडी घाटापर्यंत अनेक ठिकाणी काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले आहे. मात्र, हे कॉंक्रिटीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने अनेक ठिकाणी महामार्गावरील या काँक्रिटीकरणाच्या रस्त्याला तडे गेले आहेत. तर लोणेरे, कोलाड व नागोठणे ते कासू व गडब, आमटेम या ठिकाणचा रस्ता अद्याप कॉंक्रिटीकरण न झाल्याने व त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात डांबरीकरण केल्याने त्या डांबरीकरणाची पूर्णपणे दुर्दशा झाली आहे. त्यामुळे महामार्गावर जागोजागी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. त्यातच शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी मुंबई पुण्याकडून गावाकडे जाणाऱ्या असंख्य वाहनांमुळे वाहतूक कोंडी तर होतेच परंतु एखादे अवजड वाहन बंद पडल्यास ते देखील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहे.

कोकणातील गणेशोत्सव सण हा सप्टेंबर महिन्यात येत असून ७ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होत आहे. मात्र, आठ दिवस अगोदर म्हणजे एक सप्टेंबरपासून कोकणात चाकरमान्यांची वर्दळ चालू होणार आहे. त्यामुळे या महामार्गावर एसटी बस सहित खाजगी बसेस व हजारो कार रस्त्यावर येणार असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी केवळ रस्त्याच्या दुरवस्थेमुळे होणार आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर पडलेल्या खड्ड्यांमुळे महामार्गावरील वाहतुकीचे विघ्न दूर करण्यासाठी व कोकणातील चाकरमान्यांच्या रोशाला राष्ट्रीय महामार्ग खात्याला व सरकारला सामोरे जावे लागणार असल्याने तात्पुरती मलमपट्टी म्हणून पेव्हर ब्लॉकने खड्डे भरण्याचा नामी उपाय राष्ट्रीय महामार्ग खात्याने अवलंबला आहे. त्यासाठी जागोजागी पेव्हर ब्लॉकने खड्डे भरण्याचे काम जोमाने चालू झाले आहे, मात्र पेव्हर ब्लॉकने केलेला रस्ता बरोबर एक महिन्यांनी येणाऱ्या गणेशोत्सव काळापर्यंत टिकून राहील का? वाहनाच्या क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक पटीने या महामार्गावरून होणारी ओव्हरलोड वाहतूक हे पेव्हर ब्लॉक सहन करतील का? असा सवाल राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दक्षिण रायगड जिल्हा वाहतूक सेनेचे अध्यक्ष सुभाष मोरे यांनी विचारला आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा पूर्वी डांबरीकरणाने तयार केलेला होता. त्या काळात वापरण्यात आलेल्या डांबर व आता रस्त्यासाठी वापरण्यात येत असलेली डांबर याच्या गुणवत्तेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार असल्याने पूर्वीचा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग जो इंदापूर शहरातली तसेच माणगाव शहरातील रस्ता अजूनही जुन्या डांबरीकरणाचा टिकलेला आहे. त्याची गुणवत्ता आता डांबरीकरण करत असलेल्या महामार्गाच्या रस्त्याची गुणवत्ता यामध्ये संशोधनाची गरज असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष सुभाष मोरे यांनी सांगितले.

एकंदरीत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांना पेव्हर ब्लॉकचा मुलामा देण्याचे काम चालू आहे. मात्र महिन्याभरात या रस्त्यावरून होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे हा पेव्हर ब्लॉकचा रस्ता टिकेल का? याबाबत कोकणातील जनतेच्या मनात शंका उत्पन्न होत आहे. तसेच जन आक्रोश समितीमार्फत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी २८ जुलै रोजी होम हवन केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी जागे झाले असले तरी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापासून पुन्हा जन आक्रोश समितीमार्फत माणगाव येथे आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेमुळे पुन्हा एकदा कोकणातील जनतेमधून राज्य सरकार व केंद्र सरकारच्या महामार्गाच्या धोरणाबाबत नाराजीचा सूर उमटत असून आता कोकणातील जनता या महामार्गाच्या दुरवस्थेबाबत रस्त्यावर उतरणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत.

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहतूक पोलिसांना डोकेदुखी!

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66च्या दुरवस्थेमुळे वारंवार अवजड वाहने महामार्गावर बंद पडून अथवा रस्त्याची साईडपट्टी मजबूत नसल्याने वाहने घसरून अपघात होत असल्याने व त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला दररोज सामोरे जाताना महामार्ग वाहतूक पोलिसांना ते डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. एक तर कोकणात पडणाऱ्या अतिवृष्टीमुळे व वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पावसात भिजत वाहतूक कोंडी दूर करण्याचे प्रयत्न महामार्ग वाहतूक पोलिसांना दिवस-रात्र करावे लागत असल्याने वाहतूक पोलीस देखील या महामार्गाच्या दुरवस्थेमुळे त्रस्त झाले आहेत. दररोज पावसात भिजून वाहतूक कोंडी दूर करण्याचे व महामार्गावर बंद पडलेल्या अवजड वाहनांना रस्त्यावरून दूर हटवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या परिश्रमामुळे अनेक वाहतूक पोलिसांना पावसात भिजावे लागल्याने आजारी पडल्याचे सांगण्यात येत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!