• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

गतहारी अमावास्या म्हणजे काय? जाणून घ्या, पद्धत, परंपरा व मान्यता

ByEditor

Jul 14, 2023

आषाढी एकादशीपासून चातुर्मासाचा सात्विक काळ सुरू झाला आहे. चातुर्मासातील पहिली अमावास्या म्हणून आषाढ अमावास्या साजरी केली जाते. सन २०२३ मध्ये आषाढ अमावास्या सोमवारी येत असल्यामुळे ती सोमवती अमावास्या म्हणून विशेषत्वाने साजरी केली जाणार आहे. सोमवती अमावास्येला महादेव शिवशंकराची उपासना, आराधना आणि नामस्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाते. सोमवारी आपआपल्या मान्यतेनुसार मांसाहार करत नाही यामुळे आज शुक्रवार १४ जुलै रोजी आणि रविवार १६ जुलै रोजी मांसाहार प्रेमी गटारी साजरी करतील. त्याचप्रमाणे आषाढी अमावास्येला दीपपूजनाची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. त्यामुळे याला दीप अमावास्या असेही म्हटले जाते. या दिवसापासून निषिद्ध आहार टाळावेत, हा सांगणारा आषाढी अमावास्या म्हणजेच गतहारी अमावास्येचा दिवस असतो. मात्र, आधुनिक काळात याला हटके गोष्टींची जोड मिळाली आणि त्याचा अपभ्रंश म्हणून गटारी अमावास्या असा शब्दप्रयोग प्रचलित झाला, असे सांगितले जाते. परंतु, देशातील काही भागांमध्ये आषाढी अमावास्या हटके पद्धतीने साजरी केली जाते. याला गटारी अमावास्या असे संबोधले जाते. गटारी अमावास्या म्हणजे काय? ती कशी साजरी केली जाते? जाणून घेऊया…

गतहारी अमावास्या

राज्यभरात रविवार, १६ जुलै २०२३ रोजी गटारी अमावास्या आहे. वास्तविक पाहता याचे मूळ नाव गतहारी अमावास्या असल्याचे सांगितले जाते. जसे शाकाहारी आपण म्हणतो, त्याच अन्वये गतहारी हा शब्द आलेला आहे. गतहारी म्हणजे होऊन गेलेले असा त्याचा अर्थ आहे. आपल्याकडील सण-उत्सव, व्रत-वैकल्ये यांना शास्त्रीय आणि नैसर्गिक आधार आणि महत्त्व आहे. चातुर्मासाच्या काळात पचायला जड असलेला आहार निषिद्ध करावा, अशी प्राचीन मान्यता आणि परंपरा आहे. या दिवसापासून निषिद्ध आहार टाळावेत, हा सांगणारा आषाढी अमावास्या म्हणजेच गतहारी अमावास्येचा दिवस असतो. मात्र, आधुनिक काळात याला हटके गोष्टींची जोड मिळाली आणि त्याचा अपभ्रंश म्हणून गटारी अमावास्या असा शब्दप्रयोग प्रचलित झाला, असे सांगितले जाते.

गटारी अमावास्या

नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी रविवार म्हणजे हक्काचा दिवस असतो. त्यामुळे गटारी अमावास्येच्या निमित्ताने मांसाहारावर यथेच्छ ताव मारला जातो. आषाढ महिन्याच्या अखेरच्या दिवशी समस्त नॉनव्हेज प्रेमी मटण, चिकन, नॉनव्हेज खातात. या दिवशी विविध हॉटेलमध्येही नॉनव्हेजप्रेमींची गर्दी असते. त्याचप्रमाणे मद्यपानही केले जाते. यानंतर श्रावण मास सुरू होत असल्यामुळे बहुतांश कुटुंबांमध्ये मांसाहार आणि मद्यपान केले जात नाही. काही कुटुंबांमध्ये गणपती आगमन आणि विसर्जनापर्यंत मासांहार केला जात नाही. त्यामुळे या दिवसाला अधिक महत्त्व प्राप्त होते. रविवारचा दिवस हा कुटुंबातील सदस्यांच्या सुट्टीचा, एकत्र येऊन मजा करण्याचा हक्काचा दिवस असल्यामुळे गटारी अमावास्या साजरी करण्यासाठी रविवारला अधिक प्राधान्य दिले जाते. दुसरीकडे, श्रावणापासून जोरदार पाऊस पडतो. हवा कुंद असल्यामुळे पचनशक्तीही कमकुवत झालेली असते. त्यामुळे जड अन्न पचत नाही. तसेच हा काळ माशांच्या प्रजननाचा असतो. म्हणून मासे खाणे टाळले जाते.

आषाढ अमावास्या विविध नावाने ओळखली जाते. उत्तर भारतात श्रावण अमावास्या किंवा हरियाली अमावास्या नावाने हा दिवस साजरा केला जातो. ओडिसा राज्यात याला चितलगी अमावास्या असे संबोधले जाते. तेलंगण आणि आंध्र प्रदेश या राज्यात चुक्कला अमावास्या म्हणून हा दिवस साजरा केला जातो. आषाढ अमावास्येला दीपपूजनाला महत्त्व असल्यामुळे याला दीप अमावास्या असेही म्हटले जाते. सन २०२३ मध्ये आषाढ अमावास्या सोमवारी येत असल्यामुळे तिला सोमवती अमावास्या असेही म्हटले जाते.

आपले अनेक सण-उत्सव, व्रत-वैकल्ये, परंपरा या निसर्गाची जोडलेल्या आहेत, त्याचप्रमाणे त्या कृषी संस्कृतीशीही जोडलेल्या आहेत. भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे चातुर्मासाचा काळ हा शेतकऱ्यांसाठीही महत्त्वाचा असतो. आषाढी अमावास्येला देशातील बहुतांश भागातील शेतकरी नांगर, कुदळ, फावडे, कुऱ्हाड यांसारख्या कृषी अवजारांचे पूजन करतात. तसेच महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये पेरणीपूर्वी पोळा सणासारखा बेंदूर सण साजरा केला जातो. यावेळी बैलांना दिवसभर आराम करायला देतात. त्यांचे पूजन केले जाते. त्यांना गोडाचे पदार्थ खाऊ घातले जातात. देशभरात चातुर्मास हा आत्मिक शांतता, सुख, समृद्धी, ऐश्वर्य, वैभव प्राप्त करण्यासाठी अत्यंत भक्तिभावाने, श्रद्धेने साजरा करण्याची परंपरा अगदी प्राचीन काळापासून सुरू असल्याचे दिसते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!