नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर खरी राष्ट्रवादी कोणाची हा पेच निर्माण झाला आहे. यासाठी शरद पवार आणि अजितदादा या दोघांच्या गटानं आपलाच गट खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावा केला आहे. यावर शिक्कामोर्तब व्हावं यासाठी दोन्ही गटांनी निवडणूक आयोगात धाव घेत याचिका दाखल केली होती. यावर आयोगानं अजितदादांच्या याचिकेची दखल घेत शरद पवार गटाला नोटीस पाठवली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला नोटीस बजावलीय. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत भूमिका मांडण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत. अजित पवारांनी दाखल केलेल्या याचिकेवर ही नोटीस बजावण्यात आलीय. त्यामुळे शरद पवार गट यावर काय भूमिका मांडणार याकडे लक्ष आहे. मात्र यानिमित्तानं आता राष्ट्रवादी काँग्रेसमधला संघर्ष निवडणूक आयोगासमोर सुरू झालाय.
अजित पवार राष्ट्रवादीत बंड करून आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे सरकारला पाठिंबा दिला व उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. तर अजित पवारांसहित राष्ट्रवादीच्या एकूण ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर अजित पवार यांनी ४० आमदारांच्या सही असलेलं पत्र निवडणूक आयोगाला दिलं.
राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार, पदाधिकारी आमच्यासोबत असून राष्ट्रवादी पक्षव घड्याळ चिन्ह आम्हाला देण्यात यावे, अशी याचिका अजित पवार यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केली होती. या बंडानंतर शरद पवार गटानेही तातडीने हालचाली करत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. आता त्यावर म्हणणे मांडण्यासाठी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला नोटीस पाठविल्याचे समजत आहे.