• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ST कर्मचाऱ्यांना हक्काचे पैसे काढता येईना; महामंडळाकडून 4 महिन्यांपासून PF जमा झालाच नाही

ByEditor

Feb 17, 2025

पुणे : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराला उशीर होत असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. कर्मचाऱ्यांना पगारही थकीत ठेवल्याचे अनेकदा दिसून आले आहे. विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात एसटी महामंडळाने बस दरात 15 टक्के भाडेवाढ करत ही भाडेवढ गरजेचं असल्याचं म्हटलंय. सरकार नव्या बस घेत असून महामंडळाच्या आर्थिक स्थितीकडे लक्ष केंद्रीत करत ही भाडेवाढ महत्त्वाची असल्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले होते. मात्र, तरीही एसटी महामंडळाची परिस्थिती बिकट असल्याने चक्क एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफचे पैसेच महामंडळाने गेल्या 4 महिन्यांपासून भरले नसल्याचे समोर आले आहे. ऑक्टोबर महिन्यापासून एसटी महामंडळाने पीएफचे हफ्ते भरले नसल्याने ज्या कर्मचाऱ्यांना आपल्या पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत, त्यांना ते पैसेच काढता येईना झालेत.

मुलीच्या लग्नासाठी, नवीन घर विकत घ्यायचे असेल किंवा नवं घर बांधायचं असल्यास पीएफचे पैसे काढता येतात. मात्र, एस‌.टी.कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रॉव्हीडंट फंडाच्या रकमेतून रक्कम काढायची असेल तर ती सध्या काढता येत नाही. कारण, एस.टी. महामंडळाकडे निधीचा तुटवडा असल्याने प्रॉव्हीडंट फंडासाठीचे हप्ते भरणे महामंडळाला जमलेले नाही. ऑक्टोबर महिन्यापासून हे हप्ते थकीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महामंडळाला मिळणारा निधी हा कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारावर खर्च करावा लागतोय, असे एसटी महामंडळाचे अधिकारी सांगतात.

सध्या तोट्यात असलेल्या महामंडळाला एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफमधील रक्कम भरण्यासाठी राज्य सरकारकडून निधीची अपेक्षा आहे. मात्र, अद्याप तरी राज्य सरकारने निधी दिलेला नाही. विशेष म्हणजे जे कर्मचारी सेवानिवृत होत आहेत, त्यांचा फंड मात्र एक महिन्याच्या आत दिला जात आहे. परंतु, जे कार्यरत असलेले कर्मचारी आहेत, त्यांना विविध कारणांसाठी आपल्या फंडातील रक्कम काढायची असल्यास त्यांना वेट अँड वॉच अशी भूमिका महामंडळाचे आहे. त्यामुळे, एसटीच्या कर्मचाऱ्यांना आर्थिक तंगी सहन करावी लागत आहे. आमच्या मागण्यांकडे शासन किंवा महामंडळातील अधिकारी लक्ष देतील का, असा सवाल यानिमित्ताने एसटी कर्मचाऱ्यांनी विचारला आहे. दरम्यान, एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांच्या पीएफ हप्त्यासाठी महिन्याला 480 ते 490 कोटी रुपयांच्या निधीची गरज असते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!