ठेकेदार बदलला तरीही माणगाव व इंदापूर बायपासच्या कामाचा तिढा कायम
सलीम शेख
माणगाव : कोकणासह दक्षिणेला जोडणारा विकासाचा मार्ग म्हणून मुंबई-गोवा महामार्गाकडे पहिले जाते. या मार्गाच्या कामाची गेली चौदा वर्षापासून चांगलीच रखडपट्टी सुरु असून प्रवासी पर्यटकांना वनवास भोगावा लागत आहे. माणगाव व इंदापूर शहराला बायपास दिला गेल्याने तळ कोकणासह गोवा व दक्षिणेकडील पर्यटकांना अंतर कमी झाल्याने कोकण व गोवा दर्शन सहज घडवता येईल अशी आशा पर्यटकांना वाटत होती. मात्र, या बायपासचे काम यापूर्वी वनखाते व रेल्वे खात्याच्या मंजुरीत अडकल्याने बायपासच्या कामाचे तीन तेरा वाजले होते. त्यानंतर वनखात्याची मंजुरी मिळाली. मात्र निधी अपुरा पडत असल्याने व शासनाकडून वेळेवर निधी मिळत नसल्याचे कारण पुढे करीत पूर्वीच्या ठेकेदाराने हे काम सोडून दिले. त्यानंतर पूर्वीचा ठेकेदार बदलला. त्यानंतर सनी इंटरप्रायजेस कंपनीकडे हे काम दिले. त्यानंतरही बायपासचे काम व रुंदीकरणाचे कामात म्हणावी तितकी गती मिळत नसल्याने माणगाव व इंदापूर बायपासच्या कामाचा तिढा आजही कायमच राहिला आहे.
माणगाव व इंदापूर बायपासचे काम रखडल्याने दरम्यानच्या भागात सतत वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवासी नागरिकांची चांगलीच रखडपट्टी होत आहे. तळ कोकणासह गोव्याकडे जाणाऱ्या नागरिकांना माणगाव बाजारपेठेत अडथळा होऊ नये म्हणून माणगावच्या बाहेरून शहराला बायपास रस्ता मंजूर केला असून या बायपास मार्गाचे काम गेली १४ वर्षापासून थांबले आहे. हा बायपास रस्ता वनखात्याच्या जमिनीतून व कोकण रेल्वेला उड्डाण पूल होत असल्याने इंदापूर आणि माणगाव येथील दोन्ही शहरा लगतचे बायपासचे काम रखडले आहे. त्यातच वैयक्तिक मालकी जमीनीच्या काही मालकांना भूसंपादनाचा मोबदला मिळाला नसल्यामुळे बायपासचे काम रखडले आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक महामार्ग मंत्री यांनी ३ एप्रिल २०२२ रोजी इंदापूर येथील कार्यक्रमात मुंबई-गोवा महामार्गाच्या रस्त्याचे काम एक वर्षात पूर्ण करू अशी ग्वाही दिली होती.
माणगाव कळमजे पुलाजवळून नाणोरे गावालगत या बायपास रस्त्याचे काम २०१७ मध्ये सुरु झाले. हे काम ३० टक्के करण्यात आले होते. हा बायपास रस्ता सात कि. मी.चा असून तो माणगाव शहरा बाहेरून काढण्यात आला आहे. माणगावात वाहतुकीचा ताण पडत असून वारंवार पर्यटकांना वाहतूक कोंडीशी सामना करावा लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे कामाचे गेली अनेक दिवस भिजत घोंगडे पडले आहे. त्यामुळे प्रवाशी, पर्यटक, नागरिकांत कमालीची नाराजी पसरली आहे. अखेर शासनावर दबाव वाढत असल्याने या रुंदीकरणाच्या कामाची गाडी धीम्या गतीने का होईना सुरु असून त्या कामाला म्हणावी तितकी गती मिळत नाही. मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरण कामाला गती कधी मिळणार? असा संतप्त सवाल नागरिकांतून होत आहे.
कोकणच्या विकासाला चालना देणाऱ्या महामार्गाचे रुंदीकरण हे महत्वाचे असून कोकणचे मुख्य प्रवेशद्वार समजले जाणाऱ्या इंदापूर-माणगाव या महत्वाच्या शहराजवळून जाणाऱ्या बायपास रस्त्याचे तीनतेरा वाजल्याने कोकणवासीयांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
