• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मोड आलेला बटाटा, कांदा आणि लसूण खावं की नाही? विषबाधेचा धोका असतो का?

ByEditor

Jun 24, 2025

तुम्ही स्वयंपाकघरात रात्रीचा स्वयंपाक करत आहात आणि भाजी करताना तुमच्या लक्षात आलं, की बटाट्याला मोड आले आहेत.

अशा वेळी तुमच्या मनात शंका निर्माण होते की असे बटाटे खावेत कि फेकून द्यावेत?

कांदा, बटाटा किंवा लसूण यांना मोड आल्यानंतर ते खावेत की नाहीत, याबद्दल वेगवेगळी मतं आहेत.

मग मोड आलेली अशी भाजी खावी की नाही, याबद्दल जाणून घेऊया? सुरुवात करु बटाट्यापासून.

बटाट्याला जेव्हा मोड येतात, तेव्हा त्याचा अर्थ असतो की, ते एक रोप म्हणून वाढण्याचा प्रयत्न करत आहे.

या प्रक्रियेच्या वेळी बटाट्यात विषारी ग्लायको अल्कलॉइड वाढू लागतं. हे रोपांचं बुरशी आणि कीटकांपासून संरक्षण करतं.

यामध्ये सोलनिन नावाचं एक संयुगदेखील असतं. ते बटाट्याव्यतिरिक्त, टोमॅटो, वांगी आणि शिमला मिरचीच्या रोपांमध्येही आढळतं.

कापल्यावर आणि दीर्घकाळ साठवून ठेवल्यावर बटाट्यात या संयुगाचं प्रमाणही वाढू शकतं.

त्यामुळे मोड आलेले किंवा दीर्घकाळ साठवून ठेवलेले बटाटे माणसांच्या आणि प्राण्यांच्या आरोग्यासाठी चांगले नसतात.

मोड आलेल्या भाज्या खाणं योग्य असतं का?

डॉक्टर क्रिस बिशप लेखक आणि लिंकन विद्यापीठात पोस्टहार्वेस्ट तंत्रज्ञानाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी ‘पटेटोज पोस्टहार्वेट’ हे पुस्तक लिहिलं आहे.

डॉक्टर बिशप सांगतात की, मोड आलेल्या बटाट्यातील सर्वात धोकादायक बाब ग्लायको अल्कलॉइड असते. या घटकामुळेच बटाट्याला कडवटपणा येतो. त्यामुळे उलट्या होऊ शकतात.

त्यांनी सांगितलं की, बटाट्यात ग्लायकोअल्कलॉइड असल्याचं बटाट्याच्या हिरव्या रंगामुळे लक्षात येतं. त्यामुळेच हिरवा रंग आलेले बटाटे खाऊ नयेत.

डॉक्टर क्रिस बिशप म्हणतात की, या प्रकारच्या मोड आलेल्या बटाट्यात ग्लायकोअल्कॉइड रसायनाचं प्रमाण अधिक असण्याची शक्यता असते. त्यामुळे तो बटाटा खाता कामा नये.

बटाट्याबाबत थोडीबी शंका आली तर बटाट्याच्या ज्या भागात मोड आले असतील तो भाग कापून बाजूला केला पाहिजे.

ब्रिटनच्या फूड स्टँडर्ड एजन्सी (एफएसए) चंही म्हणणं आहे की, काही गोष्टींची काळजी घेऊन मोड आलेले बटाटे खाल्ले जाऊ शकतात.

एफएसएनं म्हटलं आहे की, “जर मोड आल्यानंतरही बटाटा कडक असेल आणि त्यात सडल्याचं कोणतंही चिन्ह दिसत नसेल, तर असा बटाटा खाता येतो.”

मात्र, एफएसएनं सल्ला दिला आहे की, जर बटाटा हिरवा दिसत असेल तर तो फेकून देणंच योग्य ठरतं. कारण विषारी घटकांमुळेच तो हिरवा रंग आलेला असतो.

एजन्सीचं म्हणणं आहे की, जर बटाटा कडक असेल, सुकलेला नसेल किंवा त्याला आलेले मोड लहान असतील तर असा बटाटा तुम्ही खाऊ शकता.

मात्र, जर बटाटा खूपच नरम किंवा खूपच जास्त सुकला असेल तर त्यातील पोषक घटक नष्ट झालेले असतील आणि त्याची चवही चांगली नसेल.

सोलनिनबाबतची मते

काही तज्ज्ञ सोलनिनच्या बाबतीत काळजी घेण्यास सांगतात.

ईस्ट एंगलिया विद्यापीठात प्लांट सायन्सेसच्या प्राध्यापक असलेल्या कॅथी मार्टिन म्हणतात की, हिरव्या रंगाचे आणि मोड आलेले बटाटे अजिबात खाऊ नयेत.

त्या म्हणतात की, प्रकाशाच्या कमतरतेमुळे (बटाट्यातील मोड वाढतात) स्टिरॉयडल ग्लायकोअल्कलॉइड सोलनिनचं प्रमाण वाढतं. असा बटाटा खाणं, माणूस आणि प्राण्यांसाठी, विशेषकरून मांजर आणि कुत्र्यासाठी ते जीवघेणं ठरू शकतं.

प्राध्यापक मार्टिन पुढे म्हणतात की, ज्या बटाट्यांचा रंग हिरवा नसतो, त्यांच्यात सोलनिनचं प्रमाण कमी असतं. मात्र कच्चे बटाटे कधीही खाऊ नयेत.

कारण त्यामध्ये सोलनिन पॉयझनिंगचा म्हणजे विषबाधा होण्याचा धोका असतो. अर्थात, असं कमी वेळा होतं. मात्र सोलनिन पॉयझनिंग किंवा सोलनिनची विषबाधा होण्याची काही प्रकरणं समोर नक्कीच आली आहेत.

1970 च्या दशकाच्या शेवटी ब्रिटनमध्ये हिरवे बटाटे खाल्ल्यानंतर 78 शालेय विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं होतं.

अर्थात असे बटाटे कमी प्रमाणात खाल्ल्यामुळे कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होण्याची शक्यता फारच कमी किंवा जवळपास नसतेच.

असे बटाटे खाल्ल्यावर हगवण, उलटी होणं आणि जोरात पोटदुखी होणं यासारखी लक्षणं दिसून येतात.

तर प्रकरण गंभीर असल्यास, अधिक झोप येणं, गोंधळलेलं असणं, अशक्तपणा आणि दृष्टीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. काही प्रकरणांमध्ये यामुळे बेशुद्ध होणं आणि मृत्यू होण्यापर्यंतच्या गोष्टीदेखील समोर आल्या आहेत.

विषारी बटाटा खाल्ल्याची लक्षणं काही मिनिटातंच किंवा काही दिवसांनी दिसू लागू शकतात.

मोड आलेल्या बटाट्यांबद्दल महत्त्वाचा सल्ला
  • मोड छोटे असतील तर तेवढा भाग आधी कापून घ्यावा
  • मोड जर एक इंचापेक्षा अधिक वाढलेले असतील किंवा बटाटा नरम झालेला असेल तर तो फेकून दिला पाहिजे
  • बटाट्यामधील हिरवा रंग असलेला भाग कापून घ्यावा. कारण तो अधिक विषारी असतो
  • जर बटाटा सडलेला दिसला किंवा त्याला बुरशी लागल्यासारखी चिन्हं दिसली तर तो फेकून दिला पाहिजे.
  • जर तुम्ही मोड आलेल्या बटाट्याचा रोपासाठी वापर करणार असाल तर त्याला सांभाळून ठेवा. अशावेळी मोड तोडणं किंवा कापणं योग्य नसतं.
  • महिला गरोदर असतील, तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाली असेल किंवा लहान मुलांना जेवू घालत असाल तर अशाप्रकारची सावधगिरी बाळगणं आवश्यक ठरतं.
बटाट्याची योग्यप्रकारे साठवणूक कशी करावी?

बटाट्याला (3-10°C) तापमानात कोरड्या आणि अंधाऱ्या जागेत ठेवू शकता.
बटाटा साठवण्याआधी तो धुवू नये, कारण त्यामुळे बटाटा सडतो.
बटाटा आणि कांदे एकत्र साठवू नये. दोन्हीमधून गॅस आणि आर्द्रता बाहेर पडते, यामुळे मोड येण्याचा वेग वाढतो.

मोड आलेले कांदे आणि लसूण

मोड आलेले कांदे आणि लसूण यांच्याबाबतीत मात्र एवढा धोका नसतो. प्राध्यापक मार्टिन म्हणतात की, बटाट्याच्या तुलनेत कांदा आणि लसूण सर्वसामान्यपणे सुरक्षित मानले जातात. कारण कांदा आणि लसणामध्ये याप्रकारचा धोका नसतो.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!