• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

संजय राऊत यांच्या नव्या गौप्यस्फोटाने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या घडामोडीचे संकेत?

ByEditor

Aug 13, 2023

मिलिंद माने
मुंबई :
भारतीय जनता पार्टीने अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला मान्य केला नाही त्यांनी तुमचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण? अशी विचारणा शिवसेना पक्षाकडे केल्यावर आम्ही एकनाथ शिंदे यांचे नाव सुचवले होते असा नवा खळबळजनक खुलासा शिवसेना नेते व राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्या राजकीय घडामोडीचे संकेत प्राप्त होत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2019 च्या सत्ता स्थापनेच्या वेळेला आमचे अनेक सीनियर नेते मंत्री होणार आहेत एकनाथ शिंदे हे ज्युनिअर आहेत त्यांच्या हाताखाली आमचे सीनियर मंत्री काम करू शकणार नाहीत तेव्हा तुम्हीच मुख्यमंत्री व्हा अशी गळ घातल्याने व शरद पवारांच्या आग्रहामुळे मी मुख्यमंत्री पद स्वीकारल्याचे उद्धव ठाकरे यांनी वारंवार स्पष्ट केले तसेच भाजपाने अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा शब्द पाळला नाही हे देखील उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. मात्र मुख्यमंत्री कोणाला करणार हे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले नाही तोच धागा पकडत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्रीपदासाठी आम्ही एकनाथ शिंदे यांचे नाव सुचवले होते असा खळबळजनक गौप्यस्फोट केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षात फूट पडण्यापूर्वी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माझ्याकडे आले होते. त्यांना तेव्हा मी तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे काय? असे विचारले होते असे उद्धव ठाकरे यांनी वारंवार सांगितले होते. तसेच 2019 मध्ये भाजपने अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा फॉर्मुला पाळला असता तर तेव्हाच एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले असते असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.

सन 2019 मध्ये केवळ अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या फॉर्मुल्यावरून शिवसेना भाजप युती तुटल्याचे म्हटले होते पण 2019 मध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास भाजपचा विरोध होता म्हणून युती तुटली असे उद्धव ठाकरे यांनी कधीही म्हटले नव्हते परंतु आज संजय राऊत यांनी याबाबतची माहिती देऊन मोठा गौप्यस्फोट केल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. सन 2019 च्या निवडणुकीपूर्वी तेव्हा भाजपामध्ये असलेले एकनाथ खडसे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून शिवसेना भाजपा युती तोडत असल्याचे म्हटले होते. कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे माहित नसावे. मोदी कुणाला चुकीची माहिती देत आहेत? असा प्रश्न संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या रोखठोक सदरामधून भाजपा व मोदी यांना विचारला आहे.

भाजपा नेतृत्वाने दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे 2019 मध्ये दुसऱ्यांना युती तुटली तेव्हा एकनाथ शिंदे यांना अडीच वर्षे मुख्यमंत्री करण्यात भाजपने नकार दिला होता. त्यामुळे शिवसेना भाजपा युती तुटली असा दावा करतानाच त्याच एकनाथ शिंदेंना भाजपने आता मुख्यमंत्री केले यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलले पाहिजे असा प्रति प्रश्न राऊत यांनी विचारला आहे.

भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्रीपदाचा अडीच वर्षाचा फॉर्मुला मान्य केला नाही. त्यावेळेला त्यांनी तुमचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण? अशी विचारणा केली. त्यावेळी आम्ही एकनाथ शिंदे यांचे नाव सुचवलं तेव्हा शिंदे यांचं नाव समजताच भाजपाने युती तोडली. याबाबत आज मात्र ते भंपकपणा करत आहेत व त्याच एकनाथ शिंदेंना बरोबर घेऊन मागील दीड वर्षापासून राज्य चालवत आहेत. यावरून भाजप किती कारस्थानी आहे हे स्पष्ट होत असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

राज्यात शिवसेना भाजपा युती ही मागील 25 वर्षापासून होती. या काळात मोदी आणि व अमित शहा कुठेच नव्हते. सन 2014 मध्ये गुजरातची ही जोडगोळी दिल्लीत अवतरली आणि त्यांनी युती तोडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2019 चा दाखला देत आहेत पण मुळात 2014 मध्ये शिवसेना भाजपा युती तुटली होती याबाबत तेव्हा भाजपामध्ये असलेले एकनाथ खडसे यांनी फोन करून ही माहिती दिली होती असे राऊत यांनी स्पष्ट केले.

यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार व अजित पवार यांच्या झालेल्या भेटीबाबत बोलताना ते म्हणाले की, शरद पवार हे कदाचित अजित पवार यांना म्हणाले असतील की 31 ऑगस्ट रोजी होणाऱ्या इंडियाच्या बैठकीत सामील व्हा!. या महाराष्ट्राच्या राजकारणात कधीच काय गुप्त राहत नाही. पहाटेच्या शपथविधीप्रमाणे परत फिरा असा सल्ला अजित पवारांना दिला असेल असे सांगून संजय राऊत म्हणाले की, राजकारणात काही घडू शकते. सध्या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये कोणीही खुश नाही ना जनता ना मंत्री या सरकारची अवस्था अत्यंत बिकट आहे व राजकारणात उलथापालथ होईल. त्याची दुसरी बाजू तुम्हाला लवकरच कळेल असे सांगून नव्या राजकीय समीकरणाची नांदी तर संजय राऊत यांनी दिली नाही अशी चर्चा राजकीय निरीक्षकांमध्ये व्यक्त केली जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!