• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कळवा रुग्णालयात आणखी 4 रुग्णांचा मृत्यू, मृतांमध्ये एका महिन्याच्या बाळाचा समावेश

ByEditor

Aug 14, 2023

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात कळवा रुग्णालयात 18 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज आणखी चार जणांचा मृत्यू झाला आहे. रात्री 12 वाजलेपासून या रुग्णालयात 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. मृतांमध्ये एक महिन्याच्या बाळाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी रात्री 6 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शनिवारी रात्री ते रविवारी सकाळ पर्यंत 18 रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेने राज्यभर खळबळ उडाली होती. आता सोमवारी पुन्हा 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

कळवा रुग्णालय मृत्यू प्रकरणी मनसे आक्रमक झालीय. मनसे कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिका भवनात शिरून आयुक्तांच्या दालना बाहेर ठिय्या मांडला. कळवा रुग्णालयात झालेल्या 18 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा जाब यावेळी विचारण्यात आला.मनसे कार्यकर्त्यांनी आयुक्त आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली….प्रशासनाला धारेवर धरत आयुक्तांनी या घटनेची जबाबदारी घेतलीच पाहिजे अशी मनसे कार्यकर्त्यांनी मागणी केलीय.

एका दिवसात 22 मृत्यू

कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रविवारी 18 रुग्णांचा मृत्यू झाला. ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालय गेल्या दोन महिन्यांपासून नुतनीकरणाच्या नावाखाली बंद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व रुग्णांचा सगळा भार हा छत्रपती शिवाजी महाराज सरकारी रुग्णालयावर पडत आहे. अपुरी डॉक्टर क्षमता आणि रुग्णांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ यामुळे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्री 18 जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. मृत्यू झालेल्या 18 पैकी 13 रुग्ण हे आयसीयूमधील तर 4 रुग्ण जनरल वॉर्डमधील होते. तीनच दिवसांपूर्वी याच रुग्णालयात एकाच दिवशी पाच रुग्णांचा मृत्यू झाला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्याच महिन्यात ठाण्यात सुपर स्पेशलिटी कॅन्सर रुग्णालयाचं भूमिपूजन केलं. तसंच जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत पाडून त्या ठिकाणी देखील मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येत आहे. मात्र हे करत असताना सर्वात जुनं छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय दुर्लक्षित झाले आहे का असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!