ठाणे : महापालिकेच्या (TMC) कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गुरुवारी दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र याबाबत अद्याप रुग्णालय प्रशासनाने कोणतीही माहिती दिलेली नाही. दोनच दिवसांपूर्वी पाच जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी गोंधळ घातला होता. आमदार जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा रुग्णालयात धाव घेत प्राशसनाला धारेवर धरले होते. त्यानंतर गेल्या 12 तासांत 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून पुन्हा एकदा कळवा रुग्णालय चर्चेत आला आहे.
ठाण्याचे जिल्हा शासकीय रुग्णालय नुतनीकरणासाठी दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे इथे जाणाऱ्या रुग्णांचा सगळा भार हा छत्रपती शिवाजी महाराज सरकारी रुग्णालयावर पडत आहे.अशातच अपुरी डॉक्टर क्षमता आणि रुग्णांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ यामुळे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्री 18 जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. मृत्यू झालेल्या 18 पैकी 13 रुग्ण हे आयसीयूमधील तर 4 रुग्ण जनरल वॉर्डमधील होते.
दरम्यान, तीनच दिवसांपूर्वी याच रुग्णालयात एकाच दिवशी पाच रुग्णांचा मृत्यू झाला होता. या सर्व प्रकारानंतर ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या अनागोंदी कारभार समोर आला होता. वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णालयातील पाच जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईंकाकडून करण्यात येत होता. एका रुग्णाचा हृदयविकाराच्या झटक्याने, उलटी झाल्याने एका रुग्णाचा, एक अज्ञात आणि एका रुग्णाच्या पायाला गळू झाला होता. तर यामध्ये एका गरोदर महिलेचाही मृत्यू झाला होता.