महावितरणचा नागरिकांच्या जीवाशी खेळ
प्रतिनिधी
महाड : महावितरणच्या विविध ठिकाणी असलेल्या ट्रान्सफार्मवरवरील वितरण पेट्या सताड उघड्या असल्याने शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, धोका निर्माण झाला आहे. असुरक्षित काम करणाऱ्या महावितरण कंपनीच्या विरोधात नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला असून करोड रुपये खर्च करणाऱ्या महावितरण कंपनीच्या गचाळ कारभाराबाबत स्थानिक अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे अशी मागणी केली जात आहे.

वीज पुरवठा करण्यासाठी जागोजागी ट्रान्सफार्मर बसवण्यात आले आहेत. वीजवाहक (ट्रान्सफार्मर) बसावल्यानंतर या ट्रांसफार्मर ला असलेल्या वितरण पेटीसाठी करोडो रुपये खर्च होतात मात्र या सुरक्षा पेटीचे दरवाजे सताड उघडे ठेवले जातात. ऐन पावसाळ्यात या ट्रान्सफॉर्मर जवळ गवत, वेली आणि झाडेझुडपे मोठ्या प्रमाणावर उगवतात. यामुळे शेजारून ये – जा करणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण झालेला आहे. अनेक ट्रान्सफॉर्मर शेतकऱ्यांच्या शेतामधून तर रस्त्याकडेला बसवण्यात आलेले आहे. आधीच शेतकऱ्यांच्या शेतातून गेलेल्या विजेच्या पोलमुळे पाळीव जनावरे आणि शेतकरी मृत्युमुखी पडल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत मात्र तरीदेखील महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी असुरक्षित काम करत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. विज बिलातून करोडो रुपये गोळा करणाऱ्या महावितरणचा असुरक्षित कारभार नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळणार आहे.

महाड तालुक्यात तसेच शहरांमध्ये विविध ठिकाणी रस्त्याकडेला असलेले ट्रान्सफॉर्मरच्या वितरण पेट्या सताड उघड्या आहेत. पावसाळ्यामध्ये उगवलेली वेली आणि गवताने या ट्रांसफार्मरला वेढा दिलेला आहे. वाहणारा वीज प्रवाह ट्रान्सफॉर्मरला स्पर्श होऊन जमिनीमध्ये उतरू शकतो. यापूर्वी वीज पोलाला स्पर्श होऊन किंवा पडलेल्या तारा स्पर्श होऊन अनेक शेतकरी मृत्युमुखी पडले आहेत. या घटनांतून अद्याप महावितरण कोणताच बोध घेत नसल्याचे दिसून येत आहे. वीज बिलाच्या माध्यमातून विविध प्रकारे विज बिलाची आकारणी होत असते मात्र त्या प्रमाणात ग्राहकांना सुविधा दिली जात नाही ग्राहक आणि शेतकरी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महावितरणच्या अधिकाऱ्यांचे कायम दुर्लक्ष राहिले आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत देखील कामचुकारपणा केला जात असल्याने अनेक घटनांमध्ये लोकांचे जीव गेले आहेत.

महाड तालुक्यात विविध ठिकाणी उघड्या ट्रान्सफॉर्मर मुळे धोका निर्माण झाला असला तरी महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे. शहराप्रमाणेच औद्योगिक क्षेत्रात असलेल्या वीज पोल आणि ट्रांसफार्मर कडे देखील दुर्लक्ष असल्याने या ठिकाणी देखील ट्रांसफार्मरच्या वितरण पेट्या सतत उघड्या असल्याचे दिसून येत आहे. औद्योगिक क्षेत्रात अनेक वीज पोल आणि ट्रांसफार्मर हे गटारातील पाण्याच्या प्रवाहातच उभे असल्याचे दिसून येते सताड उघडे असलेल्या ट्रान्सफॉर्मरवर वेलींचे साम्राज्य पसरले आहे. या परिसरात असलेल्या ट्रान्सफार्मवर सुरक्षा पेटी लावण्यासाठी पैसा खर्च केला आहे मात्र या पेट्यांची दारे व्यवस्थित लावली जात नाहीत. यामुळे या ट्रान्सफॉर्मरच्या जोडण्या उघड्या राहत आहेत. शेतात आपली गुरे चारण्यासाठी, चारा कापण्यासाठी जाणारे शेतकऱ्यांना या गचाळ कारभारामुळे धोका निर्माण झाला आहे.