• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अपात्रतेच्या निर्णयामुळे शिवसेनेच्या 16 आमदारांमध्ये कमालीची अस्वस्थता

ByEditor

Sep 11, 2023

शिवसेना आमदारांची मतदार संघ सोडून मुंबईकडे धाव

मिलिंद माने
मुंबई :
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 14 सप्टेंबरपासून शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सुनावणी चालू करणार असल्यामुळे शिवसेनेच्या बंडखोर 16 आमदारांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली असून मतदार संघ सोडून दोन दिवस अगोदरच अनेक आमदारांनी मुंबईकडे धाव घेण्यास सुरुवात केली असल्याने येत्या आठ दिवसात राज्यात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत प्राप्त होत आहेत.

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे येत्या 14 सप्टेंबरपासून विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात दुपारी बारा वाजल्यापासून शिवसेना शिंदे गटाच्या चाळीस व शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या 14 आमदारांच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात करणार असून त्याबाबत सर्व सर्व संबंधित आमदारांना याबाबत कल्पना देण्यात आली असून ती सुनावणी दोन दिवस चालणार आहे.

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे स्वतः सुनावणी घेणार असून या सुनावणी दरम्यान विधानसभा अध्यक्षांकडे आलेल्या 34 याचिका देखील निकाली काढणार आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे शिवसेना शिंदे गटाचे, ठाकरे गटातील आमदारांचे लक्ष लागून राहिले आहे. या सुनावणी दरम्यान विधानसभा अध्यक्ष काय निर्णय देणार? कोणाला दिलासा मिळणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या सुनावणीमुळे राज्यात येत्या आठ दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याचे संकेत राजकीय निरीक्षकांकडून प्राप्त होत आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना बंडखोर गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भात निर्णय दिला तर त्याचा परिणाम प्रत्यक्षरीत्या मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर देखील होणार असल्याने मुख्यमंत्री शिंदे हे मुख्यमंत्रीपदावर राहणार की जाणार? याबाबत देखील राजकीय निरीक्षकांकडून उलट सुलट चर्चा ऐकण्यास मिळत आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या बंडखोर 16 आमदारांना अपात्र ठरवले तर शिंदे गटाकडे असलेले शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह देखील जाणार की राहणार? याबाबत देखील राजकीय निरीक्षकांकडून वेगवेगळ्या चर्चा ऐकण्यास मिळत आहेत.

राज्यात शिवसेना पक्ष फुटल्यानंतर दीड वर्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसला देखील घरघर लागली व राष्ट्रवादीतील अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये शामिल होऊन मंत्री पदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याबाबत दिल्लीच्या भाजप नेत्यांनी शब्द दिल्याचे राष्ट्रवादीच्या आमदारांमधून वारंवार बोलले जात आहे. त्यामधूनच अजित पवार यांनी राज्यात सर्व ठिकाणी शक्ती प्रदर्शनाचा खेळ चालू केला आहे. त्यानिमित्ताने राज्यात अजित पवार समर्थकांनी भावी मुख्यमंत्री म्हणून सर्वत्र बॅनरबाजी चालू केल्याने शिंदे गटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वच पातळीवर अपयशी ठरत असल्याने त्यांना बदलून अजितदादा यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करणार अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या अजित पवार समर्थकांकडून राज्यात मोठ्या प्रमाणावर चर्चिली जात आहे. त्यातच 14 सप्टेंबरपासून शिवसेना आमदारांच्या होणाऱ्या सुनावणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या सुनावणी दरम्यान विधानसभा अध्यक्ष कोणता निर्णय घेतात याबाबत शिवसेना शिंदे गट व अजित पवार गटांमध्ये वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

शिवसेनेत बंडखोरी करून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे अपात्र होणारे शिंदे गटातील आमदारांची नावे पुढील प्रमाणे: एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, यामिनी जाधव, संदिपान भुमरे, भरत गोगावले, संजय शिरसाट, लता सोनवणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, चिमणराव आबा पाटील, महेश शिंदे या आमदारांबाबत विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेचा निर्णय दिला तर ते सर्वजण सहा वर्षे निवडणूक लढवण्यास अपात्र ठरू शकतात.

शिवसेनेच्या 14 आमदारांना जी नोटीस प्राप्त झाली आहे त्यांची नावे पुढीलप्रमाणे: सुनील प्रभू (मालाड), राजन साळवी (राजापूर), प्रकाश फातर्पेकर (चेंबूर), सुनील राऊत (विक्रोळी), वैभव नाईक (कुडाळ मालवण), रमेश कोरगावकर (भांडुप), कैलास पाटील (पाचोरा), नितीन देशमुख (बाळापुर), अजय चौधरी (शिवडी), राहुल पाटील (परभणी), भास्कर जाधव (गुहागर), रवींद्र वायकर (जोगेश्वर), संजय पोतनीस (कलीना).

शिवसेना ठाकरे गटातील 14 व शिंदे गटातील 40 आमदारांच्या सुनावणीला 14 सप्टेंबर पासून सुरुवात होणार असल्याने या सुनावणी दरम्यान अध्यक्ष कोणते प्रश्न विचारणार व कोणते पुरावे सादर करावे लागणार आहेत याबाबत एकत्रित चर्चा करण्यासाठी शिवसेना शिंदे गटातील 40 आमदारांनी व ठाकरे गटातील 14 आमदारांनी उद्या मंगळवारपासून मुंबईत येण्यासाठी सुरुवात केली असून मतदार संघ सोडून आपल्या राजकीय भवितव्याचा फैसला काय होणार याबाबत त्यांना चिंताग्रस्त केले असल्याने अनेक आमदार तणावाखाली असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!