मुंबई : मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं शिबीर संपन्न होत आहे. ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांच्या भाषणाने शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला होता. यावेळी संजय राऊतांनी मोदी-शाह यांच्याबद्दल एक सूचक विधान केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
संजय राऊत म्हणाले की, मोदी-शाह यांच्यासोबत आमचं वैयक्तिक भांडण नाही. परंतु देशामध्ये जे सूडाचं राजकारण सुरुय, त्याचा बदला शिवसेना घेणार आहे. शिवसेनाही सूड उगवणार आहे. उद्या आमचं सरकार आलं तर मोदी-शाह हेसुद्धा शिवसेनेमध्ये दिसतील. राऊत पुढे म्हणाले की, सत्ता आल्यानंतर ईडीच्या भीतीने देवेंद्र फडणवीस सुद्धा शिवसेनेत येतील. त्यांना घ्यायचं की नाही हे उद्धव ठाकरे ठरवतील. देशात ज्या राज्यामध्ये भाजपचं सरकार नाही तेथील सरकारला त्रास दिला जातो. तामिळनाडूचे स्टॅलिन यांनी थेट मोदी-शाहांना इशारा दिल्याचंही संजय राऊतांनी स्पष्ट केलं.
‘भाजपचे लोक मुंबईवर कब्जा करु असं म्हणत आहेत. मुंबई आणि शिवसेना लेचीपेची नाही. कुणीही यावं आणि कब्जा करावा. तुमच्यात हिंमत असेल तर मुंबई महानगर पालिकेची आणि इतर महानगर पालिकांच्या निवडणुका लावा, मग दाखवू’ असा इशारा संजय राऊतांनी दिला.
मोदी-शाह यांच्याशी आमचं वैयक्तिक भांडण नाही, या संजय राऊतांच्या विधानाने आश्चर्य व्यक्त होत आहे. सध्या शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये बरं चाललेलं नाही. त्यामुळे राऊतांनी ही गुगली टाकली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.