रायगड जनोदय digital – कडाक्याच्या थंडीनंतर आता उन्हाळा हळूहळू सुरू होत आहे. या दिवसात दिवसा तापमान वाढत आहे तर सकाळ-संध्याकाळ थोडी थंडी असते. अशा या ऋतूतील बदलामुळे जे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा आपल्या शरीरावर विपरित परिणाम होत आहे. अनेक प्रकारचे आजार विशेषतः अॅलर्जीचे आजार यावेळी डोक वर काढतात. हंगामी अॅलर्जीला गवत ताप किंवा हंगामी अॅलर्जीक नासिकाशोथ असेही म्हणतात. अॅलर्जीची ही लक्षणे एखाद्या वेळी वाढतात, त्यामुळे ताप, सर्दी आणि थंडी वाजून येणे, असे अनेक प्रकार होतात. या काळात ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे,त्यांना हंगामी अॅलर्जीचा धोका जास्त असतो.
अशावेळी काही खास उपाय करणं गरजेचं आहे. आपण अनेक घरगुती उपचारांचा वापर या काळात करू शकतो. ऋतूबदलासोबत होणार्या अॅलर्जीमध्ये खूप फायदेशीर ठरलेल्या घरगुती उपायांविषयी आपण जाणून घेऊया.
मधाचे औषधी फायदे
अॅलर्जीच्या समस्या दूर करण्यासाठी मध हे खूप फायदेशीर मानले जाते. घसा खवखवणे किंवा अॅलर्जीमुळे होणारी वेदना दूर करण्यापासून ते अॅलर्जीची इतर लक्षणे कमी करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी मधाचे सेवन फायदेशीर ठरते. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रोज सकाळी कोमट पाण्यात दोन चमचे मध आणि लिंबाचा रस सेवन करावे.
कच्च्या लसणाचे फायदे
लसूणात असलेल्या प्रतिजैविक गुणधर्मामुळे त्याचा वापर पोटाच्या समस्या दूर करण्यापासून ते हंगामी अॅलर्जी टाळण्यापर्यंत सर्व प्रकारात होऊ शकतो. दररोज रिकाम्या पोटी दोन ते चार कळ्यांचे सेवन केल्यास पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्याबरोबरच घशाच्या समस्या कमी होण्यास मदत होते.
हळदीच्या दुधाचे फायदे
हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट्ससह दाहक-विरोधी गुणधर्म जास्त प्रमाणावर आढळत असल्याने अॅलर्जीच्या सर्व समस्या दूर होण्यासाठी ती खुप गुणकारी मानली जाते. तसेच संसर्ग आणि वेदनांपासून मुक्त होण्यासाठी हळद हा सर्वात प्रभावी घरगुती उपाय आहे. हळद मधात मिसळून किंवा गरम दुधात चिमूटभर हळद घालून त्याचे सेवन करावे. त्याचे नियमित सेवन हे बदलत्या हवामानामुळे उद्भवणार्या समस्या कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.
अॅलर्जी टाळण्यासाठी काय करावे?
- धूळ, रंग किंवा परागकणांची अॅलर्जी असेल तर बाहेर जाताना मास्क घाला, मऊ कपडे घाला.
- आजूबाजूचा परिसर धूळ आणि प्रदूषणमुक्त ठेवा, घराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या.
- बंद नाक आणि सायनसपासून आराम मिळविण्यासाठी स्टीम इन्हेलर वापरा.
- अॅलर्जीच्या वेळी गरम पाणी प्यायल्याने फायदा होतो.