मुंबई : महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. यामुळे पुन्हा एकदा राजकीय समीकरणं बदलली आहेत. यावर आता भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अजित पवार आणि हे आमदार सरकारमध्ये सहभागी होत असल्याचं मत व्यक्त केलं.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “याला राजकीय भूकंप म्हणण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अजित पवार आणि ४० पेक्षा अधिक आमदार देशासाठी, महाराष्ट्राच्या कल्याणासाठी एकत्र येत असतील तर ते महत्त्वाचं आहे. मोदींनी जो संकल्प केला आहे त्याला साथ देण्यासाठी अजित पवार आणि सर्व लोक आले आहेत. त्यांचं मी अभिनंदन करतो.”
