गणेश पवार
कर्जत : पावसाळा सुरु झाला कि कर्जत तालुक्यातील निसर्ग बहरतो. अशात या ठिकाणी वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मुंबई पुण्यातील पर्यटक दाखल होत असतात. मात्र मागील ७ वर्षांपासून कर्जत तालुक्यातील वर्ष पर्यटनावर बंदीचे सावट आहे. मात्र यंदा हि बंदी उठणार अशा आशा पल्लवित झाल्या आहेत. कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी रायगचे जिल्हाधिकारी यांनी पात्र देत यंदा १४४ हा जमावबंदीचा कलम कर्जत तालुक्यात लागू करू नका असे पत्र दिले आहे. यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत देखील जिल्हाधिकारी रायगड याना सूचित केले आहे. त्यामुळे यंदा कर्जत तालुक्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटन बंदी उठणार का? याबाबत सर्वांचे लक्ष लागले आहे.
२००५ सालापासून कर्जत तालुक्यातील धबधबे, धरणे हि प्रकाशझोतात येऊन पर्यटकांच्या आकर्षणाची ठिकाणे बनली होती. पावसाळा सुरु झाला कि कर्जत तालुक्यातील निसर्ग हिरवा शालू नेसल्याप्रमाणे बहरतो. त्यामुळे या निसर्गाची भुरळ मुंबई भागातील वर्षासहल प्रेमींना पडली होती. पावसाळ्यात शनिवार, रविवार मुंबईहून येणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये पर्यटकांचे लोंढे कर्जत तालुक्यात दाखल होत होते. मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पर्यटकांमुळे येथील नागरिकांना देखील रोजगार उपलब्ध झाला होता. मात्र, दर पावसाळ्यात येथील धबधबे, धरण परिसरात येणाऱ्या पर्यटकांचे अपघात होऊन मृत्यू होऊ लागले, त्यामुळे २०१६ पासून प्रशासनाने येथील धरणे, धबधबे यावर कलम १४४ अन्वये जमावबंदी लागू करत पर्यटनस्थळांवर काही नियमान्वये बंदी लागू केली. त्यामुळे येथील पर्यटनस्थळांकडे पर्यटकांनी देखील पाठ फिरवली. तर यासह येथील छोटे मोठे उद्योग करणारे नागरिकांवर देखील संक्रांत आली. गेली ७ वर्षे हि बंदी पावसाळ्यात लागू केली जाते. तर दुसरीकडे कर्जत तालुक्यातील पर्यटन वाढावे यासाठी कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे हे आग्रही आहेत. तालुक्यात कोणतेही औद्योगिक क्षेत्र नाही, त्यामुळे हरितपट्टा असलेल्या कर्जतमध्ये पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी थोरवे यांच्याकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. मात्र, वर्षा सहलीवरील बंदी हा मुद्दा दरवर्षी उठत असल्याने यंदा याविरोधात आमदार महेंद्र थोरवे यांनी दंड थोपटले आहेत. स्थानिकांमधून देखील आमदारांच्या या भूमिकेचे स्वागत होत आहे.
यंदाच्या पावसाळ्यात कर्जत तालुक्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांनी बहरतील असे संकेत असले तरी प्रशासन होणाऱ्या अपघातांबद्दल काय उपाययोजना करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात येणारी ठिकाणे
- दहिवली पूल
- कोमलवाडी धबधबा
- बेडीसगाव धबधबा
- टपालवाडी धबधबा
- आनंदवाडी धबधबा
- जुम्मापट्टी धबधबा
- मोहिली धबधबा
- वदप धबधबा
- आषाणे धबधबा
- पळसदरी धरण व धबधबा
- कोंढाणे लेणी व धबधबा
- बेकरे कोला धबधबा
- सोलनपाडा धरण
- पाली भूतिवली धरण
- डोंगरपाडा धरण
- पाषाणे धरण
- खांडस धरण
- साळोख धरण
- अवसरे धरण
- सिलिया पॉईंट (शार्लोट लेक)
कर्जत तालुक्याला निसर्ग सौंदर्याचं लेणं लाभलं आहे. या ठिकाणी कोणतीही औद्योगिक इंडस्ट्री नाही. त्यामुळे खरंतर याठिकाणी ग्रीन इंडस्ट्री उभी करण्यासाठी आम्ही शासनाकडून प्रयत्न करत आहोत. जेणेकरून येथील नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल. मात्र, वर्षासहलीवर १४४ कलम कर्जत तालुक्यात लागू केल्यामुळे स्थानिकांच्या रोजगारावर गदा आलेली आहे. स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी यंदा १४४ कलम लागू न करता अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अशी विनंती जिल्हाधिकारी रायगड यांना केलेली आहे.
-महेंद्र थोरवे,
आमदार कर्जत विधानसभा