जालना: पंढरपूरहून वारी करून गावाकडे परत येणाऱ्या भाविकांच्या गाडीला झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. जालना जिल्ह्यातील राजूर रोडवरील तुपेवाडी जवळ काळी पिवळी जीप विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. गाडीतील सर्व जण पंढरपूर येथून वारी करून आले होते.
जीप चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या विहिरीत ही जीप जाऊन कोसळली. अपघात झाल्यानंतर ग्रामस्थांनी आणि पोलिसांनी गाडीतील प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत ७ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर तिघांना जिवंत बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल आषाढी एकादशीसाठी हे सर्व भाविक पंढरपूरला गेले होते. तेथून परत येत असताना हा अपघात झाला. जीपमधील सर्वजण राजूरच्या दिशेने जात होते. तेव्हा तुपेवाडीजवळ चालकाचे नियंत्रण सुटले आणि जीप रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीत जाऊन कोसळली. विहिरीला कठडे नसल्याने जीप थेट खाली कोसळली ज्यात ७ जणांचा मृत्यू झाला.
अपघात झाल्या क्षणी ग्रामस्थांनी जीपमधील प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने तिघा जखमींना बाहेर काढले आणि जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विहिरीतून आतापर्यंत ७ मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे समजते. जीपमध्ये १२ ते १५ प्रवासी होते.