• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

२३ जुलैचा ‘तो’ थरार आजही असह्य!

ByEditor

Jul 23, 2024
२३ जुलै १९८९ रोजी झालेल्या महापुराचे यतार्थ वर्णन करणारा नागोठणे येथील ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय राजू भिसे यांचा दैनिक ‘रायगड जनोदय’मध्ये दि. २३ जुलै २०१७ रोजी प्रसिद्ध झालेला लेख पुनःप्रकाशित करून २३ जुलैच्या आणि स्वर्गीय राजू भिसे यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न.

(लेख प्रकाशित झाला तेव्हा महापुराला २७ वर्ष झाल्याने तसा उल्लेख लेखात आहे. आज या घटनेला ३५ वर्ष झाली आहेत.)

२५ जुलै ही तारीख मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकवते. अगदी त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातल्या जांभूळपाडावासीयांसाठी २३ जुलै काळरात्र ठरली. कारण, याच दिवशी त्यांच्यावर जणू काही आस्मानी संकट कोसळलं. त्याला २७ वर्षे पूर्ण झाली आहेत. २३ जुलै १९८९…रायगडकरांच्या काळात धस्स करुन जाणारी तारीख…हिच तारीख त्यांच्या अंगावर काटा आणते, रायगडच्या अंबा नदीला पूर आला…नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. जांभूळपाड्यातील गावकरी साखरझोपेत होते. मात्र, ती रात्र त्यांच्यासाठी जणू काळरात्र ठरली. कारण अंबा नदीचं पाणी मध्यरात्रीच्या सुमारास थेट त्यांच्या घरात शिरलं. बघता बघता पाण्याची पातळी वाढली आणि होत्याचं नव्हतं झालं. महापुराचे तांडव इतके महाभयानक होतं…की कुणाचं घर, तर कुणाचे नातेवाईक डोळ्यादेखत पाण्यात वाहून गेले. यात ८४ जणांचा बळी गेला.

या घटनेला आज २७ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र आजही त्या पुराच्या आठवणी इथल्या ग्रामस्थांच्या अंगावर शहारे आणतात. या महाप्रलयापासून प्रशासनाने आजही कोणताही धडा घेतला नसल्याची खंत त्यांना बोचतेयं. २८ वर्षांनंतरही अंबा नदी पात्र रुंदीकरण आणि नदीतील गाळ काढण्याची झालेली मागणी बासनातच आहे. महापुराच्या काळ्या आठवणी इथल्या ग्रामस्थांच्या डोक्यात आजही घोंगावतात. प्रशासनानं अशा घटनांपासून बोध घेत खबरदारीचे उपाय करावेत, अशी माफक अपेक्षा इथल्या ग्रामस्थांनी व्यक्त केलीयं.

नागोठणेवासीय या आठवणीने आजही थरारतात!
२३ जुलै १९८९ ला जेवणखाणं उरकून सर्वजण रात्री झोपून गेले. मध्यरात्री बारानंतर अचानक सोसाट्याचा वाऱ्यासह पावसाने अचानक आक्राळविक्राळ रूप धारण केले आणि आज काहीतरी अघटीत घडतंय याची जाणीव नागरिकांना व्हायला लागली. त्यात विद्युत पुरवठासुद्धा खंडित झाल्याने रात्रीच्या भयाणतेत आणखीनच पर पडली. मध्यरात्री दोनच्या सुमारास अंबा नदीने आपले पात्र सोडून शहराच्या बंगलेआळी, बाजपेठ, कोळीवाडा भागात प्रवेश केला. दरवर्षी पुराचा अनुभव असलेल्या तेथील नागरिकांना क्षणाक्षणाला वाढणाऱ्या पुराच्या पाण्याच्या पातळीने आपल्यावर आस्मानी संकट आले आहे याची चाहूल लागल्याने आपल्या मुलाबाळांसह सर्वजण घरातून बाहेर पडून सुरक्षितस्थळी आसरा घेऊ लागले.

पहाटेच्या दरम्यान या पूर नव्हे, तर महाप्रलयाने शहरातील प्रभू आळी, खडक आळी ब्राम्हण आळी भागात प्रवेश केला व बघता-बघता सकाळी सातच्या सुमारास मोहल्ला, खुमाचा नाका, प्रभू आळीत पाणीच पाणी झाले. मध्यरात्रीच्या सुमारास शिवाजी चौकात महापुराच्या पाण्याने दहा फूट पाण्याची पातळी गाठली होती. पुराचे पाणी अजून काही चढणार नाही, या भाबड्या समजुतीने काही नागरिक आपल्या घराच्या माळ्यावरसुद्धा जाऊन बसले होते. याबाबत कोळीवाडयाच्या सीमेवर राहणारे येथील एक प्रथितयश वैद्यकीय व्यावसायिक तथा माजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एम. धात्रक आपला त्यावेळचा थरारक अनुभव सांगताना म्हणतात की, दरवर्षी माझ्या घरात पुराचे दोन ते तीन फूट पाणी चढत असे. मात्र तेव्हा पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने पत्नी व मुलांसह घराच्या माळ्यावर जाऊन बसलो. माळ्यावर गेलो तरी पुराच्या पाण्याने माझे घरात २५ फूट पातळी गाठल्याने माळ्यावर सुद्धा पाणी आल्याने आमचे सर्वांचे अर्धे शरीर पाण्यातच होते. नशिबाने दुपारनंतर पाण्याची पातळी कमी व्हायला सुरुवात झाल्याने एक भयानक संकटातून आम्ही वाचलो.

शहरात मध्यरात्री पातळी वाढायला सुरुवात झालेले पुराचे, नव्हे महाप्रलयाचे पाणी २४ जुलैच्या दुपारनंतर ओसरायला सुरुवात झाल्याने अनेकांचा जीव भांड्यात पडला. या महाप्रलयाने शहरात फक्त सात जीवांचा बळी घेतला असला तरी पाणी जर एक ते दोन फूट आणखी चढले असते तर अनेकांचे बळी गेले असते. या महापुरात अनेकांची घरे उद्ध्वस्त झाल्याने अनेक कुटुंबे अक्षरशः उघड्यावर पडली. या महाभयंकर प्रलयाची आठवण झाली तरी तो थरारक क्षण अनुभवलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर सत्तावीस वर्षे उलटूनही काळाकुट्ट इतिहास जिवंत उभा राहत असून, अंगावर आजही शहारे येतात!

-राजू भिसे

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!