• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रोह्यातील थरार अन् माणुसकी…

ByEditor

Jul 23, 2024
अमोल पेणकर

२३ व २४ जुलै १९८९ रोहे आणि सुधागड तालुक्यातील नागरिक कधीही न विसरू शकणारी ती रात्र खरी तर काळ रात्र होती. ही रात्र ज्यांनी अनुभवली व जे ह्या रात्रीला सामोरे गेले ते अनुभव सांगतात तेव्हा अंगावर काटा उभा राहतो अशी भयाण रात्र…

रोह्याच्या कुंडलिका नदीला पूर आला. नदीने धोक्याची पातळी ओलांडली. रोहेकर त्यावेळी साखर झोपेत होते. मात्र ती रात्र त्यांच्यासाठी जणू काही काळरात्र ठरली. कारण कुंडलिका नदीचे पाणी मध्यरात्रीच्या सुमारास नदी काठच्या गावांतील घरात शिरले बघता-बघता पाण्याची पातळी वाढली आणि साऱ्यांचे संसाराच होत्याचे नव्हते झाले. महापुराचे तांडव इतके महाभयानक होते की कुणाचे घर, तर कुणाचे नातेवाईक तर कुणाची गुरढोरं वाहून गेली. ह्या पुरात अनेक जणांचे बळी गेले. या घटनेला आज ३५ वर्षे पूर्ण झाली.

महापुराचा तडाखा रोहे तालुक्याला जसा बसला तसा सुधागड तालुक्यालाही मोठ्या प्रमाणात बसला. त्यात जांभूळपाडा हे गाव अक्षरशः नेस्तनाबूत झाले. महापुराची झळ या गावाला बसली, घरदारं, गुरेढोरे यासह ८४ माणसे वाहून गेली. त्यांची सुद्धा काळरात्र ठरली. लोक मदतीची अपेक्षा करीत होते. डोळ्यासमोर अथांग असे पाणीच पाणी होते. पाण्याशिवाय काहीच दिसत नव्हते. असा हा भयानक प्रसंग अनेकांनी अनुभवला. बरेचजण घरातील सामनासह आपल्या परिवाराला वाचवण्यासाठी धडपडत होते.

राम मारुती चौकातील दिलीप शंकर पवार, हेमंत (बंड्या) बारटके, अशोक लाड, प्रकाश रामिना, हर्षद जाधव यांनी २ ड्रम एकत्र बांधून त्याच्या साहाय्याने अनेकांना वाचवले. नदी काठावरील मोठ्या वस्तीला मोठा धोका पोहचला. शहरातील लोकांसह बाजारपेठेतील अनेकांनी आपापल्या परीने अनेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता. काही ठिकाणी सुरक्षित असलेले लोक, पाण्यामध्ये अडकलेल्या लोकांना शिजवलेले अन्न व खाद्य पदार्थ पुरवित होते. ते मानवतेचा धर्म पाळीत होते. संकटामुळे ऐक्य वाढते, समजूतदारपणा वाढतो. त्याचे प्रतीक म्हणजे संपूर्ण बाजारपेठेतील भिजून कुजलेले अन्नधान्य रोह्यातील सर्व तरुण कार्यकत्यांनी ट्रकमध्ये भरून वाहत्या नदीत सोडून दिले. त्यामुळे नागरिकांना कॉलरासारख्या कोणत्याही आजाराला सामोरे जावे लागले नाही. महापुरात रस्त्यावर वाहून आलेली माती व कारखान्यांमधील रसायन हे सर्व साफ करण्याकरिता एमआयडीसीकडून फायर ब्रिगेड बंब आणून पाण्याच्या प्रवाहाने रस्ते साफ करून घेतले. त्यावेळचे नगराध्यक्ष प्रफुल्ल बारटके व रोहे-माणगावचे आमदार अशोक साबळे जातीने मदत कार्यात सहभागी होते. या महापुराच्या काळ्या आठवणी रोहेकरांच्या डोक्यात आजही घोंगावत आहेत. परंतु प्रशासनाने अशा घटनांपासून बोध घेऊन खबरदारीचे उपाय करावेत, अशी माफक अपेक्षा रोहेकर व्यक्त करतात.

-अमोल पेणकर
रोहे-रायगड

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!