मुंबई: गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाचा मुद्दा अखेर निकालात निघणार आहे. आज संध्याकाळपर्यंत मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी काहीवेळापूर्वीच खातेवाटपाची यादी घेऊन राजभवनावर पोहोचले आहेत. आता याठिकाणी राज्यपाल रमेश बैस हे खातेवापटाच्या यादीवर स्वाक्षरी करतील. खातेवाटपाची यादी राजभवनावर पोहोचल्याच्या वृत्ताला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुजोरा दिला. ते शुक्रवारी दुपारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी अजित पवार यांनी म्हटले की, आज संध्याकाळपर्यंत खातेवाटपाची यादी जाहीर होईल. खातेवाटपाची यादी राजभवनावर पोहोचली आहे. राज्यपालांची सही झाल्यानंतर त्याबाबत आदेश निघेल आणि कोणाला कोणती खाती मिळाली, हे समजेल, असे अजित पवार यांनी सांगितले. मात्र, कोणाला कोणते खाते मिळाले, याबाबत स्पष्टपणे बोलण्यास अजित पवार यांनी नकार दिला. कोणाला कोणतं खातं द्यायचं हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा असतो. आम्ही त्यांच्या मंत्रिमंडळात आहोत, ते देईल ते खातं आम्ही घेतो. आम्ही तीन पक्ष मिळून सरकार चालवत आहोत. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र मिळून काम करण्याची आमची मानसिकता आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
अजित पवार गटाच्या वाट्याला कोणती खाती?
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे या सगळ्यांना कोणती खाती मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अजित पवार यांच्यासोबत अनुभवी मंत्री असल्याने त्यांच्या गटाने महत्त्वाच्या खात्यांची मागणी केली होती. खातेवाटपात शिवसेना आणि भाजपच्या काही मंत्र्यांच्या खात्यांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडील कृषी खाते तसेच भाजपकडील ग्रामविकास खाते पवार गटाकडे जाणार असल्याचे समजते. याशिवाय पवार गटाला अर्थ व नियोजन खाते व अन्यही एक महत्त्वाचे खाते मिळणार असल्याचे खात्रीलायकरित्या समजते. या खात्यामुळे पवार गटाची शहरी भागावरील पकड मजबूत होण्यास तसेच घराघरांत पोहोचण्यास मदत मिळण्याची शक्यता आहे.