रावसाहेब दानवे, धैर्यशील पाटील यांच्यासह अन्य दोन जणांची नावे कोअर कमिटीकडे
मिलिंद माने
मुंबई : लोकसभा निवडणुकीत राज्यातील मराठवाड्यासह, विदर्भात व उत्तर महाराष्ट्रात मनोज जरांगे यांच्या मराठा फॅक्टरमुळे भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना पराभव पत्करावा लागला. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मराठा फॅक्टरला मराठा समाजातीलच व्यक्तीमुळे तारले जाऊ शकते याची जाणीव भाजपा पक्षाला असल्याने मागील पस्तीस वर्षात मराठवाड्याचे दमदार नेतृत्व असणाऱ्या रावसाहेब दानवे यांना पराभव होऊन देखील पुन्हा एकदा दोन वर्षासाठी राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 35 वर्षांची राजकीय कारकीर्द मराठवाड्यातून गाजवणाऱ्या रावसाहेब दानवे यांना कल्याणराव काळे यांनी पराभूत केले. त्यानंतर रावसाहेब दानवे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार लोकांचा कौल मी स्वीकारला असून यापुढे राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद कोणतीही निवडणूक लढणार नाही असे त्यांनी जाहीर केले होते. पक्षाने मला सरपंच व्हायला सांगितले तरी मी तयार आहे, पक्षाने मला सरपंच पदापासून आमदार, खासदार व मंत्री या पर्यंत सर्व पदे दिली असल्याने पक्षाचा आदेश माझ्यासाठी शेवट आहे अशी प्रतिक्रिया देणाऱ्या रावसाहेब दानवे यांना पुन्हा एकदा पक्षाने राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठवाड्यातील मराठा समाजाचे दमदार नेतृत्व म्हणून रावसाहेब दानवेंकडे पाहिले जाते. मात्र, मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे रावसाहेब दानवे यांना जालना लोकसभा मतदारसंघातून पराभूत व्हावे लागले. लोकसभा निवडणुकीत झालेली चूक भाजपाच्या लक्षात आली असून त्याची पुनरावृत्ती पुन्हा मराठवाड्यात झाली तर राज्यात सत्तेत येणे अवघड आहे, याची जाणीव असल्याने मराठवाड्यातील मराठा आंदोलकांशी तोडीस तोड नेता म्हणून रावसाहेब दानवे पाहिले जाते. त्यासाठी रावसाहेब दानवे यांना भाजपाचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची सातारा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवड झाल्याने त्या रिक्त जागेवर रावसाहेब दानवे यांची (२.०४.२०२६ राज्यसभेचा कार्यकाळ) दोन वर्षासाठी नियुक्ती करण्याचा निर्णय भाजपाने घेतला असल्याचे खात्रीलायकरित्या समजते.
जालना जिल्ह्यातील जवखेडा गावातून रावसाहेब दानवे यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. भाजपा शाखाध्यक्ष ते तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस, प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, ग्रामपंचायत सरपंच ते केंद्रीय राज्यमंत्री असा रावसाहेब दानवे यांचा राजकीय प्रवास आहे. मराठवाड्यात भाजपा पक्ष रुजवायचा असेल तर व राज्यात पुन्हा सत्तेत यायचा असेल तर मराठ्यांमधीलच आक्रमक चेहरा म्हणून रावसाहेब दानवेंकडे पाहिले जाते. लोकसभा निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघातून राज्यसभेवर असणारे छत्रपती उदयनराजे भोसले व मुंबईतून पियुष गोयल हे दोन्ही भाजपाचे खासदार लोकसभेवर निवडून गेल्याने या दोन जागा राज्यसभेच्या रिक्त झाल्या आहेत. त्यापैकी एक जागा त्याची मुदत ४.७.२०२८ पर्यंत आहे. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला देण्यात येणार आहे, तर दोन वर्ष मुदत असणाऱ्या जागेवर रावसाहेब दानवे यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. या जागेवर भाजपातून दक्षिण रायगडमधील भाजपा जिल्हाध्यक्ष व शेकापक्षातून आमदार म्हणून दोन वेळा निवडून आलेले धैर्यशील पाटील यांचे नाव चर्चेत होते. मात्र मराठा फॅक्टर भाजपाला मराठवाड्यातच विधानसभा निवडणुकीत चितपट करण्याची शक्यता लक्षात घेता मराठवाड्यातीलच मराठा नेतृत्व असणाऱ्या रावसाहेब दानवे यांची वर्णी या जागेवर करण्याचा निर्णय भाजप नेतृत्वाने घेतल्याचे खात्रीलायकरीत्या समजते.
भाजपातून राज्यसभेवर जाण्यासाठी माजी मंत्री भारती पवार तसेच नंदुरबारच्या पराभूत खासदार हिना गावित, दक्षिण रायगड जिल्हा भाजपा अध्यक्ष धैर्यशील मोहन पाटील, भाजपा पुरस्कृत माजी खासदार नवनीत राणा यांच्यासह या चार जणांची नावे दिल्लीतील कोअर कमिटीकडे पाठवण्यात आली असल्याचे समजते. मात्र, पक्षाने मराठा आक्रमक नेतृत्व देण्यात धोरण स्वीकारल्याने रावसाहेब दानवे यांना या निमित्ताने संधी मिळाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, राज्यसभेची उमेदवारी अर्ज भरण्याचा २१ ऑगस्ट हा शेवटचा दिवस असून याबाबत अधिकृत नावाची घोषणा २० ऑगस्ट, मंगळवारपर्यंत होण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.