प्रा. तुळशिदास मोकल
मुंबई विद्यापीठ
राष्ट्रीय सेवा योजना
रायगड जिल्हा समन्वयक
राष्ट्रीय सेवा योजना ही भारत सरकारच्या युवा व क्रिडा मंत्रालयाकडून चालविली जाणारी ही एक योजना आहे. ही योजना सुरवातीला विद्यार्थ्यांच्या सह-शैक्षणिक उपक्रमाचा एक भाग होती. आज या योजनेचा सहभाग शैक्षणिक अभ्यासक्रमात करण्यातआला आहे. त्यामुळें या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्याना या योजनेच्या ज्ञानात्मक व कार्यात्मक अनुभवाचा लाभ घेता येणारआहे.

महात्मा गांधीजींच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी २४ सप्टेंबर १९६९ रोजी ही योजना लागू करण्यात आली. सुरुवातीला या योजनेत भारतभरातील ३९ विद्यापीठांमधील ४०००० पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी सहभागी झाले होते. आज महाराष्ट्र राज्यात प्रती वर्षी राष्ट्रीय सेवा योजनेत ५,००,००० विद्यार्थी, मुंबई विद्यापीठात प्रती वर्षी ५०,००० विद्यार्थी तर रायगड जिल्ह्यात प्रती वर्षी ७५,००० विद्यार्थी सहभागी होतात. ‘Not Me But You’ “मी स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीआहे” हे राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीदवाक्य आहे. हे वाक्य लोकशाही जीवनाचे सार प्रतिबिंबित करते. हे वाक्य निःस्वार्थ सेवा आणि दुसऱ्या व्यक्तीची सेवा करण्याची प्रेरणा देते. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक कल्याणाची भावना निर्माण करणे आणि विद्यार्थ्यांनी पक्षपात न करता समाजाला सेवा देणे हे राष्ट्रीय सेवा योजनेचे ध्येय आहे.

राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक हे गरजू प्रत्येकाला त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि सन्मानाचे जीवन जगण्यासाठी मदत करतात. खेड्यापाड्यातील लोकांकडे संसाधनांची कमतरता असूनही त्यानें चांगले जीवन कसे जगावे याची शिकवण देतात. विद्यार्थ्यांमध्ये सामजिक बांधिलकी व समाजसेवा तत्वे व कार्यप्रणाली विकसीत करावयाची असेल तर राष्ट्रीय सेवा योजना सहभाग हा एक महत्वपूर्ण मार्ग आहे. राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक म्हणून कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला सलग दोन वर्ष या योजनेत स्वयंसेवक म्हणून सहभागी होता येत. राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक होणे ही प्रत्येक विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पहिली महत्वाची संधीअसते कारण राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक बनल्याने विद्यार्थ्यांच्या समाज सेवा कार्याचा आरंभ होतो. राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी होणाऱ्या कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नियमित राष्ट्रीय सेवा योजना व निवासी राष्ट्रीय सेवा योजना अशा दोन स्तरावर समाज सेवा करण्याची संधी उपलब्ध होते.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या नियमीत उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजनेत सहभगी झालेल्या विद्यार्थ्यांना समाज सेवेशी सबंधित असणारे वृक्षारोपण कार्यक्रम, रक्तदान शिबीर कार्यक्रम, आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम व आपत्ती व्यवस्थापन सहभाग अनुभव, एड्स प्रतिबंधात्मक जनजागृती कार्यक्रम, अवयवदान जनजागृती कार्यक्रम, योग प्रशिक्षण कार्यक्रम, स्त्री-पुरुष समानता कार्यक्रम, स्वच्छ्ता अभियान कार्यक्रम, वनराई बंधारे निर्मिती कार्यक्रम, सायबर गुन्हे दक्षता व जागृती कार्यक्रम, पर्यावरण जनजागृती कार्यक्रम, रस्ते सुरक्षा प्रबोधन कार्यक्रम, महिला स्वयंम संरक्षण कार्यक्रम , मेरी बेटी प्यारी बेटी जनजागृती कार्यक्रम, शोषखड्डे निर्मिती कार्यक्रम, वेगवेगळ्या समस्यांशी संबंधित पथनाट्य जनजागृती कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा माध्यमातून जनजागृती कार्यक्रम, प्रभात फेऱ्यांच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम, प्लॅस्टिक मुक्त अभियान उपक्रम, कापडी पिशव्या निर्मिती व वाटप कार्यक्रम, कागदी पिशव्या निर्मिती व वाटप कार्यक्रम साक्षरता अभियान कार्यक्रम, शासकीय योजना माहिती प्रसारण सहभाग, राष्ट्रीय एकात्मता उपक्रम, कौशल्य विकास उपक्रम, पल्स पोलिओ उपक्रम, कायदेविषयक साक्षरता जनजागृती कार्यक्रम आदी कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी उपलब्ध होते. त्यामुळे समाज सेवक बनण्यासाठी आवश्यक असणारे सर्व ज्ञान व कार्य अनुभव घेण्याची संधी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या नियमीत उपक्रमांच्या माध्यमातून मिळते.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सात दिवसाच्या निवासी शिबिरामध्ये सहाभगी होण्याची संधी उपलब्ध होते. या निवासी शिबिरात स्वतःच्या घरापासून सात दिवस बाहेर राहण्याचा अनुभव घेता येतो. हे निवासी शिबीर तीन सत्रात घेतले जाते. श्रमदान, प्रबोधान व मनोरंजन असे हे शिबिराचे तीन सत्र असतात. या शिबिरात विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील समस्यांची जाणिव करुन दिली जाते, त्याच बरोबर त्या समस्या कशा सोडवाव्यात याचे ज्ञान दिले जाते. प्रार्थना, कवायत, सांघिक एकात्मता, व्यक्तिमत्व विकास, नेतृत्व गुण विकास, श्रमसंस्कार, प्रबोधान, मनोरंजन, या सर्व घटकांचा समग्र अनुभव विद्यार्थ्यांना या राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी राष्ट्रीय सेवा योजनेतून घेता येतो. या माध्यमातून विद्यार्थ्यांना बाह्यविश्वाचा अनुभव घेता येतो.
राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी झालेल्या कार्यक्षम विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय नेतृत्व गुण विकास शिबीर, कौशल्ये विकास प्रशिक्षण शिबीर, जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबीर आदी शिबिरांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. या शिबिरात हे विद्यार्थी जिल्हास्तरावर आपल्या महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी झालेल्या कार्यक्षम विद्यार्थ्यांना विद्यापीठस्तरावर योग प्रशिक्षण, भजन संध्या, प्रजासत्ताक पूर्व संचलन निवड चाचणी आदी शिबिरांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी झालेल्या कार्यक्षम विद्यार्थ्यांना राज्यस्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या आपत्ती व्यवस्थापनावर आधारीत आव्हान शिबीर, सांस्कृतिक प्रवाहावर आधारीत उत्कर्ष शिबीर या शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळते. राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी झालेल्या कार्यक्षम विद्यार्थ्यांना राष्ट्रीयस्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय एकात्मता शिबीर, साहस शिबीर, युवा स्थलांतर शिबीर आदी शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळते.
या सर्व संधी व्यतिरिक्त जे विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये दोन वर्ष उत्तम कामगिरी करतील अशा विद्यार्थ्यांना जिल्हा, विद्यापीठ, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय सेवा योजनेचा सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून पुरस्कार मिळविण्याची संधी मिळू शकते. या संधींचा विचार केला तर राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी हे निश्चित आहे. या योजनेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून अनुभव घ्यावा ही या लेखानिमित्त अपेक्षा.